मुंबई : महाराष्ट्रात जन्मलेले परंतु पालक लष्करात असल्याने अन्य राज्यांतून दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांच्या राज्य कोटय़ासाठी पात्र आहेत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने  दिला आहे.या विद्यार्थ्यांचे पालक देशाची सेवा करतात आणि सेवेच्या अटींमुळे देशाच्या विविध भागात तैनात आहेत. परिणामी या मुलांचा जन्म महाराष्ट्रात झाला असला तरी त्यांनी त्यांचे दहावी-बारावीचे शिक्षण येथे पूर्ण केलेले नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता त्यांना पदवी अभ्यासक्रमात प्रवेशाची मुभा देणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”

पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमात राज्य कोटय़ातून प्रवेश घेण्याच्या पात्रतेच्या निकषांना आव्हान देण्यात आले होते. त्यावरील निर्णय देताना न्यायालयाने उपरोक्त निर्वाळा दिला. याचिकाकर्ते लष्करी अधिकाऱ्यांची मुले आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. तथापि, त्यांनी नवी दिल्लीतील लष्करी शाळेतून दहावी-बारावीचे शिक्षण घेतले आहे. वडील महाराष्ट्राबाहेर विविध ठिकाणी तैनात असल्याने या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेता आले नाही. याचिकाकर्त्यांने पात्रतेच्या निकषाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच याचिकाकर्त्यांना शिक्षणाच्या संधींपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा दावाही करण्यात आला.