मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज (२७ जून) सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण हे नव्वदीपार गेले आहेत. पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा आहे.

मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील २ लाख ४९ हजार ५० जागांसाठी २ लाख २८ हजार ३१२ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी १ लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर, ५५ हजार ६५५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, २० हजार ७८३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १४ हजार ४४८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे.

हेही वाचा – … अखेर मुंबईत परतला, शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी

पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयात कला शाखेच्या ३४ हजार ८०० जागा उपलब्ध असून १२ हजार ८०८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे. तसेच वाणिज्य शाखेच्या १ लाख २६ हजार ७५५ जागा उपलब्ध असून ६९ हजार ६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विज्ञान शाखेच्या ८४ हजार २०५ जागा उपलब्ध असून ४८ हजार १४३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी ३ हजार २९० जागा उपलब्ध असून ६३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहेत.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जागांसोबत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या जागांसाठीही होत असते. ज्या विद्यार्थ्यांनी २२ जून ते २६ जून या कालावधीत कोटांतर्गत जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रवेश अर्ज लॉक केला असेल व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या जागेसाठीही प्रवेश अर्ज भरून लॉक केला असेल, अशा विद्यार्थ्यांना दोन्ही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय अलॉट होऊ शकते. मात्र, कोणत्या महाविद्यालयात कोणत्या कोट्यातून प्रवेश निश्चित करायचा आहे, हा निर्णय विद्यार्थी व पालकांचा असणार आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जागांसोबत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या जागांवर २७ जून ते १ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश पात्रता गुण तपासून पहावेत आणि त्या अनुषंगाने दुसऱ्या नियमित फेरीसाठी महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून लॉक करावा.

प्रवेश निश्चित कसा करायचा?

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. पहिल्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करून कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. जर पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर विद्यार्थ्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

हेही वाचा – पृथ्वीवरील अस्तित्त्वासाठी नैसर्गिक जलप्रवाह पूररेषेचे अचूक सीमांकन आवश्यक, उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण नव्वदीपार

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण हे नव्वदीपार गेले आहेत. पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत चर्चगेट येथील एच.आर. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९३.०० टक्के, के. सी. महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८६.००टक्के, वाणिज्य शाखेसाठी ९१.४ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८७.६ टक्के, जय हिंद महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८९.६ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ९१.६ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८८.८ टक्के, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयांत कला शाखेसाठी ९३.५ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८९.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ९१.६ टक्के, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयांत कला शाखेसाठी ९२.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ९३.४ टक्के, पोदार महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९४.४ टक्के, रुपारेल महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८५.८ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ९०.६ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ९१.८ टक्के, विले पार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८१.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८९.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ९०.६ टक्के, डहाणूकर महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९०.८ टक्के, मिठीबाई महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८६.८ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ९१.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८९.४ टक्के, एन. एम. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९३.४ टक्के प्रवेश पात्रता गुण असतील.