मुंबई : अकरावीच्या तीन नियमित, सहा विशेष आणि दैनंदिन गुणवत्ता (डेली मेरिट राऊंड) प्रवेश फेरी राबविल्यानंतर मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून जवळपास १ लाख ३४ हजार ४१७ जागा रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांत बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त विविध व्यावसायिक पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांकडे वाढत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया खूपच लांबली आणि बहुसंख्य नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागली असून अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन काही प्रमाणात कोलमडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दैनंदिन गुणवत्ता फेरीअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची लिंक संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये सक्रिय करून देण्यात आली आहे. त्यामुळे द्विलक्षी विषयासाठी (बायफोकल) प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी द्विलक्षी विषयासाठीच्या रिक्त जागांची स्थिती पाहून सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करून प्रवेश घेऊ शकतात.

हेही वाचा – मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव

हेही वाचा – शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज

शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ अंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांसाठी जवळपास ३ लाख ३८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ७३ हजार ८९८ (९१.१८ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून जवळपास १ लाख ३४ हजार ४१७ (३२.९२ टक्के) जागा रिक्त आहेत. तसेच २६ हजार ४९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत. यापैकी अनेकांनी अर्ज करून नंतर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे.‘अनेक विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर व्यावसायिक पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीही अर्ज करतात. जेव्हा विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, तेव्हा ते अकरावीच्या पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करूनही प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे अर्जदार आणि प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीमध्ये मोठा फरक दिसतो. अकरावी प्रवेशाच्या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. तसेच यंदा दैनंदिन गुणवत्ता फेरीअंतर्गत बहुसंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत’, असे अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.