मुंबई : यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्हे असून तिसऱ्या नियमित फेरीनंतरही अद्याप १ लाख ८३४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही. नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण आणि विद्यार्थ्यांना दहावीचे परीक्षेत मिळालेले गुण यांची तुलना न करताच बहुसंख्य विद्यार्थी हे महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदवत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रीया संथगतीने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या नियमित फेरीत विविध महाविद्यालयांतील १ लाख ७० हजार ८६० जागांसाठी १ लाख ५३ हजार ८८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ५३ हजार ५४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले.

पहिल्या दोन नियमित प्रवेश फेऱ्यांत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) नव्वदीच्या उंबरठ्यावरच राहिले होते. तिसऱ्या फेरीत प्रवेश पात्रता गुणांमध्ये एखाद टक्क्यानेच घट पाहायला मिळाली. मात्र, तिसऱ्या नियमित फेरीनुसार कला व विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मुंबई महानगरक्षेत्रातून सर्वाधिक अर्ज वाणिज्य शाखेसाठी आले असून तिसऱ्या नियमित फेरीत वाणिज्य शाखेसाठीचे प्रवेश पात्रता गुण हे स्थिर असून जेमतेम एखाद टक्क्यानेच वाढ झालेली आहे.

हेही वाचा >>>INS ब्रह्मपुत्रा जहाजाला लागलेल्या भीषण आगीत एक खलाशी बेपत्ता; युद्धनौकाही एका बाजूला झुकली!

मुंबई महानगरक्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची तिसरी प्रवेश यादी सोमवारी (२२ जुलै) जाहीर करण्यात आली. या यादीनुसार १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, ८ हजार ४३३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ७ हजार ३३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले आहे. तिसऱ्या प्रवेश यादीनुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. संस्थात्मक, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश यादी १९ जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर कोट्यातील प्रवेशही २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित केले जाणार आहेत.

तिसऱ्या प्रवेश फेरीअंतर्गतचे प्रवेश पात्रता गुण (दुसऱ्या फेरीचे पात्रता गुण)

● एच. आर महाविद्यालय, चर्चगेट : वाणिज्य शाखा ९७.२ टक्के (९२.४ टक्के)

● सेंट झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट : कला शाखा ९७.२ टक्के (९२.८ टक्के), वाणिज्य शाखा ८८.४ टक्के (८८.०० टक्के), विज्ञान शाखा ९२.०० टक्के (८९.६ टक्के)

● के. सी. महाविद्यालय, चर्चगेट : कला शाखा ८७.८ टक्के (८५.०० टक्के), वाणिज्य शाखा ९१.८ टक्के (९१.२ टक्के), विज्ञान शाखा ८७.६ टक्के (८६.४ टक्के)

● जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट : कला शाखा ९२.२ टक्के (८९.२ टक्के), वाणिज्य शाखा ९२.०० टक्के (९१.२ टक्के), विज्ञान शाखा ८८.४ टक्के (८७.४ टक्के)

● रुईया महाविद्यालय, माटुंगा : कला शाखा ९३.४ टक्के (९१.६ टक्के), विज्ञान शाखा ९५.४ टक्के (९२.४ टक्के)

● पोदार महाविद्यालय, माटुंगा : वाणिज्य शाखा ९२.०० टक्के (९४.२ टक्के)

● रुपारेल महाविद्यालय, माटुंगा : कला शाखा ८७.०० टक्के (८४.८ टक्के), वाणिज्य शाखा ९०.२ टक्के (९०.३ टक्के), विज्ञान शाखा ९२.४ टक्के (९०.८ टक्के)

● एसआयईएस वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, शीव : वाणिज्य शाखा ८५.८ टक्के (८६.४ टक्के)

● साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले : कला शाखा ८०.८ टक्के (७८.६ टक्के), वाणिज्य शाखा ८९.४ टक्के (८८.८ टक्के) , विज्ञान शाखा ९१.८ टक्के (८९.६ टक्के)

● डहाणूकर महाविद्यालय, विले पार्ले : ९०.२ टक्के (९०.४ टक्के)

● भवन्स महाविद्यालय, अंधेरी : कला शाखा ७८.४ टक्के (७९.६ टक्के), वाणिज्य शाखा ८९.६ टक्के (८८.६ टक्के), विज्ञान शाखा ८९.८ टक्के (८८.८ टक्के)

● मिठीबाई महाविद्यालय, विलेपार्ले : कला शाखा ९०.४ टक्के (८८.०० टक्के), वाणिज्य शाखा ९१.४ टक्के (९०.४ टक्के), विज्ञान शाखा ८९.२ टक्के (८८.२ टक्के)

● एन. एम. महाविद्यालय, विलेपार्ले : वाणिज्य शाखा ९५.०० टक्के (९२.२ टक्के)

● वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड : कला शाखा ९२.२ टक्के (८८.०० टक्के), वाणिज्य शाखा ९२.६ टक्के (९२.०० टक्के), विज्ञान शाखा ९६.२ टक्के (९२.०० टक्के)

● मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड : वाणिज्य शाखा ९२.८ टक्के (९१.८ टक्के)

● बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे : विज्ञान शाखा ९४.२ टक्के (९१.८ टक्के)

● सी. एच. एम महाविद्यालय, उल्हासनगर : कला शाखा ७३.०० टक्के (६३.८ टक्के), वाणिज्य शाखा ८५.६ टक्के (८३.०० टक्के), विज्ञान शाखा ९०.६ टक्के (८९.४ टक्के)

● फादर अग्नेल मल्टीपर्पज महाविद्यालय, वाशी : वाणिज्य शाखा ८६.६ टक्के (८६.०० टक्के), विज्ञान शाखा ९७.६ टक्के (९३.४ टक्के)

● सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे : कला शाखा ६३.०० टक्के (५३.६ टक्के), वाणिज्य शाखा ७७.४ टक्के (७५.२ टक्के), विज्ञान शाखा ८३.०० टक्के (८३.४ टक्के)

● बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण : कला शाखा ९४.०० टक्के (९१.०० टक्के), वाणिज्य शाखा ९३.२ टक्के (९०.४ टक्के), विज्ञान शाखा ९३.८ टक्के (९२.६ टक्के)

हेही वाचा >>>रेल्वे मार्गावर दररोज तीन ते चार आत्महत्या; आत्महत्या करण्यात पुरुषांची संख्या अधिक

शाखानिहाय उपलब्ध जागा आणि निवड झालेले विद्यार्थी

शाखा – उपलब्ध जागा – निवड झालेले विद्यार्थी

कला – २५ हजार ८२३ – ४ हजार ३३२

वाणिज्य -८९ हजार ३७ – ३१ हजार ५५८

विज्ञान – ५३ हजार ५२० – १६ हजार ९१४

व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – २ हजार ४८० – २५०

एकूण – १ लाख ७० हजार ८६० – ५३ हजार ५४

प्रवेश पात्रता गुणांमध्ये वाढ का?

अकरावी प्रवेशासाठीच्या प्रत्येक फेरीसाठी महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम बदलण्याची आणि नवीन विद्यार्थ्यांना नावनोंदणी करण्याची मुभा आहे. मात्र, सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्येच नामांकित महाविद्यालयातील बहुसंख्य जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे जागा कमी आणि गतफेरीतील प्रवेशापासून वंचित असलेले व नवीन नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, पहिल्या दोन फेऱ्यांच्या तुलनेत तिसऱ्या नियमित फेरीअंतर्गत प्रवेश पात्रता गुणांमध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होत असते. विविध फेऱ्यांतून शेवटच्या फेरीपर्यंत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडी अजून प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण आणि नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण यांची तुलना न करताच महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदवत आहेत. काही विद्यार्थ्यांनी कमी गुण असूनही दहापैकी चार ते पाच महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवले आहेत, त्यामुळे कदाचित तिसऱ्या फेरीनंतरही अर्ज करूनही एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही.- डॉ. शोबना वासुदेवन, प्राचार्य, पोदार महाविद्यालय