मुंबई : सरलेले २०२४ हे वर्ष आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. २०२३ मधील सर्व उच्चांक मोडीत काढून औद्याोगिकीकरण पूर्व काळापेक्षा गत वर्षांत तापमान सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सलग १३ महिने सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८५० ते १९०० या औद्याोगिकीकरण पूर्व काळातील सरासरी वार्षिक तापमानाच्या तुलनेत २०२३ हे वर्ष आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले होते. २०२३ मध्ये १.४५ अंश सेल्सिअसने तापमान जास्त होते. २०२३ च्या तुलनेत सरलेल्या २०२४ मध्ये ०.०५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन १.५० (१.५) अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. गत वर्षांत ४१ दिवस उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला, तर १३० दिवस लोकांनी उकाडा, उष्णतेच्या झळा अनुभवल्या. लहान बेटे, विकसनशील देशांना तापमान वाढीचा जास्त फटका बसला. असे युरोपियन क्लायमेट एजन्सी कोपरनिक्सने म्हटले आहे.

हेही वाचा : नव्या वर्षात रस्ते विकासाला गती

वर्षभरात हवामान प्रकोपाच्या (टोकाचे हवामान. अति उष्णता, अति थंडी, अतिवृष्टी) २१९ घटना घडल्या. या घटनांत ३ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. भारतासह पाकिस्तान, दुबई, ब्राझील, व्हिएतनाम आणि मोरोक्कोच्या वाळवंटात अतिवृष्टीमुळे महापुराच्या घटना घडल्या. २०२४ या वर्षाने नजीकच्या भविष्यातील मोठ्या आणि विध्वंसक हवामान बदलाची चुणूक दाखवली आहे. वर्ल्ड वेदर अॅट्रिब्यूशन या हवामानविषयक संस्थेनेही वरील माहितीला दुजोरा दिला आहे.

सलग १३ महिने उष्णतेची लाट

आफ्रिकन देश सुदान, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये तीव्र उष्णतेमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. लाटेने उत्तर कॅलिफोर्निया, डेथ व्हॅलीत कहर केला. दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांमध्ये तीव्र उष्णतेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. एल- निनो आणि हरित वायू उत्सर्जनामुळे तापमानवाढ झाल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले होते.

हेही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही, प्रतिज्ञा करा! नववर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

हवामान बदलामुळे जगभरातील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. उष्णतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. अति थंडी, अति उष्णता, अतिवृष्टीमुळे पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळामुळे लोकांपुढील समस्या वाढल्या आहेत. जीवाश्म इंधन जाळत राहिल्यास आणि दरवर्षी सरासरी ०.०५ अंश सेल्सिअसने तापमान वाढ होत राहिल्यास २०४० पर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर होईल.

  • डॉ. फ्रेडरिक ओटो, प्रमुख, वर्ल्ड वेदर अॅट्रिब्यूशन
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2024 recorded warmest year average temperature rise by 1 5 degree celsius css