मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला असून संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय तरूणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. आरोपीला मुंबईत आणून याप्रकरणी अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> जागावाटपाचा घोळ मिटेना! महायुती, महाविकास आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या; अंतिम निर्णयाकडे लक्ष

हुसैन शेख (२४) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो झारखंड येथील जमशेदपूरमधील रहिवासी आहे. आरोपीने धमकीच्या संदेशात स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले होते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप मदत क्रमांकावर एक धमकीचा संदेश आला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोईशी असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असा इशारा दिला आहे. याप्रकरणी १७ ऑक्टोबरला वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरळी पोलीसांची कारवाई

संदेशानंतर वाहतूक पोलिसांनी याप्रकारणी वरळी पोलिसांकडे तक्रार केली असून याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती संदेश पाठवणारा झारखंडमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर वरळी पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. मोबाइल क्रमांकाच्या मदतीने पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. चौकशीत त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन वरळी पोलीस मुंबईत पोहोचले व आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली.अटक करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आणखी एक धमकीचा संदेश पाठवण्यात आला असून त्यात गुवाहाटी येथील एका १७ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबियांना नोटीस जबावण्यात आली आहे. तसेच त्यांना वरळी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.