मुंबई महापालिका आणि केंद्राच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेनंतरही क्षयरोगामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे. क्षयरोगामुळे मुंबईत दररोज तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे भीषण वास्तवही समोर आले आहे. विशेष म्हणजे पालिका व केंद्रीय आरोग्य विभाग यांनी गेल्या दोन वर्षांत क्षयरोगाविरोधात धडक मोहीम राबवून २१ कोटी रुपये खर्च केले आहेत.
महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २००४ ते २०१४ या काळात ३ लाख ३६ हजार १२२ क्षयरुग्णांची नोंद झाली.
याचाच अर्थ दरवर्षी ३० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यातील ८० टक्केरुग्ण हे नियमित उपचारांनी बरे होत असले तरी अपुरा आहार व उपचारांमधील अनियमिततेमुळे क्षयरोगाची पुढील पायरी गाठली जाते. मुंबईतील झोपडपट्टीतील दाटीवाटीमुळे हा आजार वेगाने पसरतो. २००४-०५ या वर्षांत क्षयरोग नियंत्रणासाठी केवळ ६५ लाख रुपये खर्च करण्यात आले.
 २००५ ते २०११ या काळात प्रतिवर्षी एक कोटीवरून तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला. २०१० या वर्षीच्या जानेवारीत हिंदुजा रुग्णालयाने औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोग रुग्णांबाबत संशोधन प्रसिद्ध केल्यानंतर क्षयरोगाविरोधातील मोहीम तीव्र झाली. २०११-१२ या वर्षांत चार कोटी रुपये, २०१२-१३ या वर्षांत सात कोटी रुपये, तर २०१३-१४ या वर्षांत हा निधी तिपटीने वाढवून १४ कोटींवर नेण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 die of tb everyday in mumbai