लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत ‘स्त्री २’ वगळता नव्या चित्रपटांना फार मोठे यश हाती लागलेले नसताना पुन:प्रदर्शित चित्रपटांनी चित्रपटगृह व्यावसायिक, वितरक आणि निर्मात्यांनाही मोठा दिलासा दिला. दोन महिन्यांत पुन्हा प्रदर्शित झालेल्या पाच चित्रपटांनी ५० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला.

जुने चित्रपट नव्याने प्रदर्शित होण्याचा पायंडा नवा नाही. यात ‘पीव्हीआर-आयनॉक्स चित्रपटगृह समूह’ अग्रेसर राहिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत इम्तियाज अली, करीना कपूर-खानसारख्या कलाकारांच्या चित्रपट महोत्सवांच्या निमित्त ४७ चित्रपट नव्याने प्रदर्शित करण्यात आले.

आणखी वाचा-Aaditya Thackeray : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० जागांवर विजय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “इथूनच विजयाचा…”

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या चित्रपटकर्मींच्या कलाकृतींचा सन्मान व्हावा आणि प्रेक्षकांना त्या पुन्हा पाहायला मिळाव्यात यासाठी अशा खास चित्रपट महोत्सवांचे आयोजन करण्याचे धोरण आम्ही स्वीकारले. केवळ स्मृतिरंजन म्हणून नव्हे तर तरुण पिढीही जुने चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करते, असे आमच्या लक्षात आले. नुकत्याच झालेल्या करीना कपूर खानच्या चित्रपट महोत्सवात ‘जब वुई मेट’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांना सर्वाधिक गर्दी होती. त्यामुळे प्रेक्षकसंख्या वाढण्याबरोबरच आर्थिक गणितही जुळून आले, असे ‘पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेड’च्या धोरणप्रमुख निहारिका बिजली म्हणाल्या.

९ ऑगस्टला पुन:प्रदर्शित केलेल्या ‘लैला मजनू’ या इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाने ११.५० कोटी रुपये कमाई केली. ३० ऑगस्टला पुन:प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाने ३.२५ कोटी तर सलीम-जावेद या जोडीच्या कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ३१ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ने १३ कोटी रुपयांची कमाई केली. १३ सप्टेंबरला पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘वीर झारा’ या चित्रपटाने ४.२५ कोटी तर याचदिवशी पुन:प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ चित्रपटाने २००० पासून आजवर पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या व्यवसायापेक्षा सर्वाधिक २६.७० कोटी रुपये कमाई केली.

आणखी वाचा-Mega Block On Central Railway : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक;असं असेल लोकलचं वेळापत्रक

जुने चित्रपट नव्याने

दाक्षिणात्य चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यापासून या प्रकाराची सुरुवात झाली होती. आता हिंदी चित्रपटांच्या बाबतीत हा पुन:प्रदर्शनाचा प्रकार चांगलाच रुजला असून नवीन असो वा जुना चित्रपट तो चांगला असेल तर लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव घ्यायला आवडतो हेच यातून अधोरेखित झाले आहे, असे मत ‘मुव्हीटाईम सिनेमा’चे सुनील घोलप यांनी व्यक्त केले.