मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या मंगळवारी बाबुलाल घाशीराम शर्मा या व्यवसायिकाच्या गाडीला घेरुन ५० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चारजणांच्या टोळीला जेरंबद करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. शर्मा यांच्या कंपनीचा भागीदार असलेल्या सुभाष मेरे यानेच हा कट रचून रोकड लंपास केल्याची बाब उघड झाली आहे.
बॉम्बे रेयॉन फॅशन कंपनीतील कामगारांच्या पगाराची एक कोटी रुपयाची रक्कम घेऊन बाबुलाल शर्मा हे ४ जून रोजी बोईसरला जात होते. शर्मा यांची गाडी  ढेकाळे गावाजवळ येताच चार जणांच्या टोळक्यांनी शर्मा यांच्या गाडीला घेरले.
 गाडी थांबताच शर्मा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून समोरच असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. याबाबत शर्मा यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात शर्मा यांच्या कंपनीतील भागीदार सुभाष मेरे याने आपला कारचालक स्वप्नील पाटील, दिनकर बरगा, शफीक पठाण, रमाकांत जाधव, जयकुमार जाधव आणि ओमसिंह राठोड यांच्यासाथीने हा कट रचल्याची बाब समोर आली. यात सुभाष मेरे, स्पनील पाटील यांच्यासह जयकुमार जाधव आणि ओमसिंह  राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपये रकमेसह गुन्ह्य़ा वापरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.