दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिपादन केली. तर राज्यात आणखी ६३ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितले.
पोलीस खात्याच्या संशोधन व सुधारणा विभागाने पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या ‘दहशतवादाचा सामना करण्या’बाबतच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आर.आर.पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, तसेच संशोधन आणि सुधारणा विभागाचे पोलीस महासंचालक कुलदीप शर्मा उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दहशतवादाचे स्वरूप व्यापक बनले आहे. शेजारील राष्ट्राकडून पसरवला जाणारा दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, दहशतवादासाठी होणारा सोशल मीडियाचा वापर यांच्या मदतीने काही विघातक शक्ती लोकशाहीवर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा हल्ला रोखण्यासाठी सक्षम व्यूहरचना आखणे गरजेचे आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच अत्याधुनिक हत्यारांची खरेदी यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुप्तचर यंत्रणांचे सक्षमीकरण, प्रशिक्षण, सुसंवाद, परस्परातील समन्वय व सहकार्य वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले.
राज्य पोलीसदलात आतापर्यंत ५५ हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून आगामी पाच वर्षांत आणखी ६३ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचेही आर. आर. पाटील यांनी सांगितले.