गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. तसेच, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ गोत आहे. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, असं असलं, तरी लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईतील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ओमायक्रॉन गंभीर नसल्याची चर्चा, पण..

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर यावेळी बोलताना भाष्य केलं. “पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकतो. पण पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणं देखील दिसत आहेत. पण ते तसंच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

..तर इमारती सील होतील

दरम्यान, मुंबईत इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले, “जरी केसेस वाढत असल्या, तरी पॅनिक होण्याची गरज नाही. डॉक्टरचा सल्ला महत्त्वाचा आहे. ट्रेस करत राहणं, टेस्ट करत राहणं आवश्यक आहे. दहाहून जास्त कोणत्याही बिल्डिंगमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर अशा इमारती सील करण्यात येतील. आत्ता आपल्याकडे ५४ हजार बेड उपलब्ध आहेत. बाहेरून येणारे किंवा आपल्याकडचे पॉझिटिव्ह हे जास्तीत जास्त लक्षणं नसलेले आहेत. पण तरीही आपण हलगर्जी करणं चुकीचं राहीलं”, असं ते म्हणाले.

Covid: महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करण्याचा राजेश टोपेंचा इशारा, म्हणाले “दोन दिवसात मुख्यमंत्री…”

ओमायक्रॉन गंभीर आहे की नाही, डॉक्टरवर सोडा

दरम्यान, ओमायक्रॉनवर व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या संदेशांवर देखील त्यांनी निशाणा साधला. “सध्या व्हॉट्सअॅपवर ओमायक्रॉन गंभीर आहे, नाहीये असं सगळं सुरू आहे. पण हे सगळं आपण डॉक्टरवर सोडायला हवं. आपण किंवा व्हॉट्सअॅप ठरवायला लागलो की ओमायक्रॉन गंभीर नाही, तर ते चुकीचं आहे”, असं ते म्हणाले.

शाळा-कॉलेजचं काय?

“शाळा, कॉलेज याविषयी आपण ट्रिगर लावलेले आहेत. ते हिट झाल्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल. गरज पडली, तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “डबलिंग रेट वाढला आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या वेगाने केसेस वाढत आहेत, मास्क लावणं, काळजी घेणं , दुसरा डोस घेणं हे आम्ही सांगत आहोत”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.