मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिले. त्यांना अटक करण्यात आल्यास त्यांची २० हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर सुटका करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी आझमी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यामुळे, आझमी यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी तो अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेऊन त्यांना अटकेपासून दिलासा दिला, त्याचवेळी, १२ ते १५ मार्चदरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
आपल्याला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबने अनेक मंदिरे बांधली होती. त्यामुळे, आपण औरंगजेबला क्रूर शासक मानत नाही. तसेच, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्ध ही राज्य कारभाराशी संबंधित होती. त्याला कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी किनार नव्हती, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत आझमी यांच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. आझमी यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली जात होती. त्यानंतर विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, आपण कोणतही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचा दावा अबू आझमी यांनी केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
आझमी यांचा दावा
आझमी यांनी पूर्वनियोजित मुलाखती किंवा पॉडकास्ट दरम्यान काहीही विधान केले नव्हते, तर राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पत्रकारांनी अचानक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी औरंगझेबबाबतचे विधान केले. यावरून आझमी यांनी कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा जाणूनबुजून अपमान करण्याचा किंवा कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या पूर्वनियोजित हेतूशिवाय उत्स्फूर्तपणे पत्रकारांशी संवाद साधला होता, असा दावा आझमी यांचे वकील अमीन सोलकर यांनी न्यायालयात केला.
तक्रारदाराने आझमी यांच्या मुलाखतींचे संपूर्ण संभाषणाची प्रत किंवा चित्रफीत पोलिसांसमोर सादर केली नाही, तर निवडकपणे काही विधाने सादर केली आणि ती संदर्भाबाहेर उद्धृत केली होती, असा युक्तिवाद सोलकर यांनी केला. त्यामुळे, पोलिसांनी आझमी यांच्याविरुद्ध घाईघाईने गुन्हा नोंदवला असून खरोखरच काही गुन्हा घडला आहे की नाही हे तपासले नाही, असेही सोलकर यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.