मुंबई : जीवाला धोका असल्याचा दावा करून आपल्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून अन्यत्र हलवले जाऊ नये या मागणीसाठी कुख्यात गुंड अबू सालेम याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी होणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहातच ठेवण्याची सालेमची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली होती. त्याचवेळी, त्याला ३ जुलैपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले होते. सालेम याने विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बुधवारी त्याची याचिका सुनावणीसाठी आली. मात्र, हे प्रकरण आपण ऐकू शकत नसल्याचे न्यायमूर्ती गोखले यांनी सांगितले. त्यामुळे, सालेमच्या वकिलांनी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर करून त्यावर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने गुरुवारी ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी ठेवली.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याबाबतच्या मुद्यावर अखेर पडदा, आयोगाला आरोपांबाबत १० जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सालेम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवाय, अटकेपासून शिक्षा सुनावली जाईपर्यंतचा त्याने कारागृहात घालवलेला कालावधी त्याला झालेल्या शिक्षेतून विशेष सीबीआय न्यायालयाने नुकताच माफ केला. याशिवाय, प्रदीप जैन प्रकरणातही त्याने घालवलेला हा कालावधी शिक्षेतून माफ करण्यात आला आहे. त्यामुळे, लवकरच आपली कारागृहातून सुटका होणार आहे. त्यामुळे, आपल्याला अन्य कारागृहात ठेवल्यास आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सालेमने याचिकेत केला आहे.

हेही वाचा >>> महालक्ष्मी रेसकोर्सवर अखेर पब्लिक पार्क; १२० एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात, भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी

तळोजा कारागृहात आपल्याला अतिसुरक्षित अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याउलट, इतर कारागृहात आपल्याला ठेवण्यात आले तर तेथे बंदिस्त असलेल्या प्रतिस्पर्धी गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांकडून आपल्यावर हल्ला होण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे, कारागृहातून आपली काही महिन्यांनी सुटका होणार असताना आपल्याला इतर कारागृहात हलवण्याचा कारागृह प्रशासनाचा निर्णय हा अनावश्यक आणि वाईट हेतुने घेण्यात आल्याचा दावाही सालेम याने याचिकेत केला आहे. आपल्यावर दिल्लीतही दोन खटले चालवण्यात येत असून त्यासाठी तेथील न्यायालयात जावे लागणार आहे. परंतु, आपल्याला अन्य कारागृहात ठेवल्यास या खटल्यांसाठी जाण्यात अडचणी येतील आणि खटल्याला विलंब होईल, असेही सालेम याने याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, तळोजा कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षाची दुरवस्था झाली आहे आणि हा कक्ष तातडीने दुरूस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे, सालेम याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येणे गरजेचे असल्याचे कारागृह प्रशासनाने विशेष न्यायालयातील सुनावणीच्या वेळी न्यायालाला सांगितले होते.