मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत अंधेरी येथील १४ ठिकाणांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्ते व पदपथांवरील फेरीवाल्यांच्या पथाऱ्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना या कारवाईनंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, तसेच इतर अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणांवरील कारवाईला वेग दिला आहे. अधिक वर्दळीच्या परिसरांमध्ये नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटवावी, जेणेकरून नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी जुलै महिन्यात संबंधितांना दिले होते. त्यानुसार, ठिकठिकाणी अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही केली जात आहे.

हेही वाचा – गुंतवणूकदारांची ११०० कोटींची फसवणूक : लेखापाल अंबर दलालप्रकरणाशी संबंधित मुंबई, कोलकाता येथे ईडीचे छापे

मुंबईतील अंधेरीसह अनेक परिसर फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीचीही समस्या जटील होत आहे. गेल्या दोन दिवसांत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागांतर्गत अंधेरी येथील एस. व्ही. मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक परिसर, सी. डी बर्फीवाला मार्ग, एन. दत्त अप्रोच मार्गासह एकूण १४ ठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याची कार्यवाही पूर्ण केली. भाजपचे अंधेरी येथील आमदार अमित साटम यांनी एएलएम आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत अंधेरी येथील १४ ठिकाणांची यादी दिली होती.

हेही वाचा – मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता

गेल्या दोन दिवसांत १४ ठिकाणांवरून अतिक्रमण आणि बेकायदेशीर फेरीवाले हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. पालिकेतर्फे सातत्याने कारवाई केली जात आहे. अंधेरी रेल्वे स्थानक परिसर आणि जे.पी. मार्गावरील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमण रोखण्यासाठी सतत देखरेख ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे, रस्त्यावर बेकायदेशीररित्या स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर वापरून अन्नपदार्थ शिजवणाऱ्यांवरही कारवाई केली आहे, असे साटम यांनी सांगितले.