मुंबई : उत्तम विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आल्यानंतरही विजय कदम यांनी रंगभूमीची कास सोडली नाही. ‘खंडोबाचं लगीन’सारखं लोकनाट्य, ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा त्यांच्या स्वत:च्या कल्पनेतून आकाराला आलेला एकपात्री प्रयोग या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती ठरल्या. ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचे प्रयोग त्यांनी परदेशातही केले. त्यांच्या ‘विजयश्री’ या नाट्य संस्थेतर्फे ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचे त्यांनी देश-विदेशात लंडन, अमेरिका ते दुबई, कतार, सिंगापूरसारख्या देशांमध्येही ७५० हून अधिक प्रयोग केले. त्यांच्या ‘खुमखुमी’ या एकपात्री प्रयोगालाही परदेशातील प्रतिसाद मिळाला. ‘टूरटूर’ नाटकाने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.

बाबूराव तांडेलही अखेरची भूमिका

‘इरसाल कार्टी’, ‘दे दणादण’, ‘दे धडक बेधडक’, ‘हळद रुसली, कुंकू हसलं’, ‘राजानं वाजवला बाजा’, ‘गोळाबेरीज’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘रेवती’, ‘देखणी बायको नाम्याची’, ‘कोकणस्थ’ अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी कधी विनोदी, कधी गंभीर प्रकृतीच्या भूमिकाही केल्या. पुढे हिंदीतही त्यांनी अनेक छोट्या – मोठ्या भूमिका केल्या. दूरचित्रवाहिनी माध्यमाचा प्रभाव जोरात असताना त्यांनी मराठीत ‘पार्टनर’, ‘गोट्या’, ‘दामिनी’, ‘इंद्रधनुष्य’, ‘घडलंय बिघडलंय’ सारख्या मराठी मालिकांमधून, तर ‘श्रीमान श्रीमती’, ‘मिसेस माधुरी दीक्षित’, ‘घर एक मंदिर’, ‘अफलातून’ अशा हिंदी मालिकांमध्येही भूमिका केल्या होत्या. ‘झी मराठी’ वाहिनीवर २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘ती परत आलीये’ या मालिकेत साकारलेली बाबूराव तांडेल ही त्यांची भूमिका अखेरची ठरली.

हेही वाचा >>> ‘विजय कदम हा उत्कृष्ट अभिनेता, अभ्यासू नट’ ; अभिनेता-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी जिवलग मित्राच्या आठवणी जागविल्या

शालेय वयातच बालनाट्यापासून सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला गिरणगावाने अनेक कलाकार मिळवून दिले, विजय कदमही याच गिरणगावातील सांस्कृतिक-सामाजिक मुशीतून घडलेले कलाकार होते. शालेय वयातच बालनाट्यापासून त्यांची सुरुवात झाली होती. शिरोडकर हायस्कूलमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्याने त्यांनी शाळेत असतानाच अनेक आंतरशालेय नाट्यस्पर्धा, कार्यक्रम यातून काम करायला सुरुवात केली. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ हे त्यांचे पहिले बालनाट्य. पुढे रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यातून त्यांची घोडदौड सुरू राहिली. ‘अपराध कुणाचा’ हे त्यांनी कुमारवयात केलेले पहिले व्यावसायिक नाटक. ‘रथचक्र’ या नाटकातील भूमिकेतून त्यांच्यातील कलाकार किती ताकदीचा आहे याची जाणीव नाट्य दिग्दर्शक – निर्मात्यांना झाली.

आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची विनोदबुद्धी अतिशय उत्तम होती, त्यामुळे सेटवर असो किंवा बाहेर कुठेही असो ते प्रसन्न वातावरण तयार करायचे.

किशोरी शहाणे, अभिनेत्री

मला विजय कदम यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. १९८३ साली ‘टूरटूर’ या नाटकातून मी माझ्या कामाला सुरुवात केली. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम ही सुपरहिट जोडी होती. त्यांना बघत बघत मी शिकलो. विजय कदम यांची भाषेवरची पकड उत्तम होती.

प्रशांत दामले , अभिनेता

‘खंडोबाचं लग्न’ या नाटकात हेगडी प्रधान हे पात्र विजय साकारायचा. त्यानंतर आम्ही ‘टूरटूर’हे नाटक केले. ते नाटक मी खास विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी लिहिले होते. त्यानंतर आलेले ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक विजय काही वर्षांपूर्वीपर्यंत यशस्वीरीत्या करीत होता.

पुरुषोत्तम बेर्डे , लेखक / दिग्दर्शक

मी फार लहान असताना त्यांचे ‘रथचक्र’ हे नाटक पाहिले होते. त्यानंतर ‘विच्छा माझी पुरी करा ’ या नाटकातील हवालदार हे त्यांचे पात्र, ‘खंडोबाचे लग्न’ या नाटकातील त्यांचे काम हे सदैव स्मरणात राहणारे आहे.

केदार शिंदे , दिग्दर्शक

विजय कदम वाचनप्रेमी मिश्कील अभिनेता होता. त्याला वाचनाची आवड होती, त्यामुळे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्याने खूप काम केले आहे. एक उत्तम नट आणि लाडका मित्र गमावला आहे.

जयवंत वाडकर , अभिनेता

मी दिग्दर्शित केलेल्या ‘हलकं फुलकं’ या नाटकात विजय एकटा ७ ते ८ भूमिका साकारायचा. त्याच्या जाण्यामुळे एक उत्तम नट आणि मित्र आम्ही गमावला.

विजय पाटकर, अभिनेता

त्यांची विनोदाची वेळ आणि सादरीकरण दोन्ही अप्रतिम होते. त्यांच्यासारखा विनोद करणे आजच्या तरुण पिढीने शिकावे एवढे ते अप्रतिम कलाकार होते.

किशोरी आंबिये ,अभिनेत्री