मुंबई: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल हा जगभर गाजतो आहे. यातूनच ‘टेस्ला’चे इलॉन मस्क यांनीही संशय व्यक्त केला आहे, अशी टिप्पणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. मतमोजणीच्या १९व्या फेरीनंतर मते का जाहीर करण्यात आली नाहीत, असा सवालही शिवसेनेने केला आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अनिल परब यांनी ही मतमोजणी संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषद घेऊन केला. ही मतमोजणी योग्य प्रकारे झालेली नाही. त्यामुळे या मतमोजणी विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार प्रतिनिधी व निवडणूक अधिकारी यांच्यातील मतमोजणीत ६५० मतांचा फरक असल्याचे अॅड. अनिल परब यांनी सांगितले.

हेही वाचा >>>एका वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रम सोडल्यास पदविका मिळणार

मतमोजणीत वायव्य मुंबई मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला. हा संपूर्ण निकाल संशयास्पद आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. मतमोजणीची एक फेरी झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते जाहीर केली जात होती पण १९ व्या फेरी नंतर ही मते जाहीर केली गेली नाहीत, शेवटच्या फेरी पर्यंत कीर्तिकर आघाडीवर असताना अचानक टपाली मतमोजणी जाहीर करण्यात आली. टपाली मतदान हे सुरुवातीला जाहीर करण्याची आवश्यकता होती पण ते २६ व्या फेरीत जाहीर करण्यात आले. त्या मतमोजणीत वायकर विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद आहे. उमेदवार प्रतिनिधी आणि निवडणूक अधिकारी यांच्यातील अंतर जाणीवपूर्वक जास्त ठेवण्यात आले होते. मतमोजणीच्या सीसी टीव्ही चित्रीकरणाची मागणी करूनही ते दिले गेले नाही. त्यामुळे ही मतमोजणी पारदर्शक नाही, असे परब यांनी सांगितले. वायव्य मुंबईतील प्रयोग देशात इतर ठिकाणी केला गेल्याची शक्यता आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. वायकर यांचा विजय हा संशयास्पद असल्याने त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांचे वर्तन संशयास्पद होते. मतमोजणीच्या वेळी त्यांची धावपळ सुरू होती. त्यांना सारखे फोन येत होते. कोणाचे फोन येत होते याची माहिती आमच्याकडे आहे. त्या सारख्या जागेवरून उठून का जात होत्या, असा सवालही शिवसेनेने केला आहे. वंदना सूर्यवंशी या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाईची मागणीही शिवसेनेने केली आहे.

इतर मतदारसंघात संशय का नाही शिंदे

वायव्य मुंबई मतदार संघातील मतमोजणी वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील जनतेची विरोधकांकडून सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वायकर यांच्या विजयावर अशाच प्रकारे दिशाभूल केली जात आहे. ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले. त्या ठिकाणी ठाकरे गटाला गडबड दिसत नाही. महाविकास आघाडीने एवढ्या जागा जिंकल्या त्या ठिकाणी त्यांचा ईव्हीएम मशिनवर संशय नाही. हा प्रकार म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ या प्रकारात मोडणारा आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाचे प्रत्युत्तर

ठाकरे गटाच्या या आरोपांना शिंदे गटाने प्रतिउत्तर दिले आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयावर समाजमाध्यमांद्वारे संशय व्यक्त करणाऱ्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिंदे गटाचे उपनेते संजय निरुपम यांनी केली तर जनतेची दिशाभूल करणाऱ्या बातम्या छापणाऱ्या वर्तमानपत्रांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी सांगितले.