मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयश महायुतीने गांभीर्याने घेतले असून दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजांचा विश्वास संपादन करून झालेल्या चुका दुरुस्त करू. यातून लोकसभेपेक्षा विधानसभेचा निकाल नक्कीच वेगळा लागेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला. पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन अजित पवार गटाच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी अर्थसंकल्पात महायुतीपासून दूर गेलेल्या समाज घटकांना अधिकचा निधी देण्याचे पवार यांनी सूचित केले. लोकसभेत कमी जागा मिळाल्या तरी खचून जाऊ नका, असा सल्ला नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत महाविकास आघाडीला ४३.९० टक्के तर महायुतीला ४३.३० टक्के मते मिळाली आहेत. उभयतांमध्ये फक्त अर्धा टक्के मतांचा फरक आहे. विरोधकांनी चुकीचे कथानक रचल्याने काही समाज घटक आपल्यापासून दूर गेले. त्यांचे आपल्यापासून पडलेले अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. संविधान बदलणार, असा प्रचार विरोधकांनी केला. त्याला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत घटना बदलण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे पवार म्हणाले. गेले दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची दोन दिवस दिल्लीत बैठका पार पडल्या. त्यात लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका कशा दुरुस्त करता येतील यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये सामील झालो तरी आमची विचारधारा सोडलेली नसल्याचे पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी पुढील १२० दिवस आपल्याकडे आहेत. या काळात आपल्यापासून दूर गेलेल्या अल्पसंख्याक समाजाला पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिका पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मांडली.

हेही वाचा >>> श्रीरामाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य : सर्व गुन्हे एकत्र करणाच्या आव्हाडांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

जागावाटपावरून मतमतांतरे

आपल्याबरोबर ५० पेक्षा अधिक आमदार आहेत. या जागा तर मिळतीलच पण त्यापेक्षा अधिक जागा आपल्या वाट्याला येतील, असा दावा पटेल यांनी केला. विधानसभेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेएवढ्याच जागा राष्ट्रवादीलाही मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली. तर जागावाटपावर कोणीही मतप्रदर्शन करू नये, अशी तंबी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

शरद पवारांबद्दल कृतज्ञता

पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना कायमच लक्ष्य केले होते. ‘वय झाले आता थांबा’ असा सल्ला जाहीरपणे दिला होता. लोकसभा निवडणुकीत अपयशातूनच बहुधा अजित पवार यांची शरद पवारांबद्दलची भूमिका बदलेली दिसते. ‘शरद पवार यांनी २४ वर्षे पक्षाला समर्थ नेतृत्व दिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो’, असे उदगार अजित पवार यांनी काढले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction after defeat in lok sabha poll zws