सध्या पालिकेकडून पाणीपुरवठा होणारे शहरातील आठ हजार ग्राहक १ जानेवारीपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व शहरात जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होईल. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतील वार्षिक तीन कोटी रुपयांची बचत होऊन २२ अधिकारी आणि कर्मचारी अन्य कामांसाठी उपलब्ध होणार आहेत.
नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी मंगळवारी या संदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी राजेश कानडे, उपअभियंता हिंदुराव पाटील, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, पाणीपुरवठा सभापती स्वप्नील बागुल आदी या बैठकीस उपस्थित होते.
सध्या अंबरनाथ शहरातील ७५ टक्के पाणी जीवन प्राधिकरण तर २५ टक्के पाणी पालिका प्रशासनाकडून पुरविले जाते. पाणीपुरवठा व वसुली कामात सुसूत्रता यावी, या हेतूने पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये झालेल्या ठरावांनुसार हा निर्णय घेण्यात आला. सध्या पालिका आठ हजार ग्राहकांसाठी एमआयडीसी, जीवन प्राधिकरण तसेच स्वत:च्या मालकीच्या चिखलोली धरणातून पाणी घेते. महिनाभरात हे ग्राहक जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.  

Story img Loader