मुंबई : कौटुंबिक वाद, कामाचा ताण, आर्थिक अडचण, आजारपण, नैराश्य, प्रेमभंग आदी कारणामुळे अनेक जण आत्महत्येचा पर्याय निवडतात. अनेक जण मध्य किंवा पश्चिम रेल्वे मार्गावर धावती लोकल अथवा लांबपल्ल्याच्या गाड्यांसमोर उडी मारून आत्महत्या करतात. गेल्या सहा महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ५१ जणांनी आत्महत्या केली असून त्यात ४७ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज सरासरी तीन ते चार जण आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धकाधकीच्या दैनंदिन जीवनात विविध कारणांमुळे अनेक जण नैराश्याने ग्रासले आहेत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रेमाला कुटुंबाकडून होणारा विरोध, कार्यालयातील कामांचा ताण, अतिकामामुळे येणारा तणाव, मानसिक आजार, जवळचे कोणी नसणे, व्यसन आदी विविध कारणांमुळे अनेक जण आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. आत्महत्या करण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवर ३४ जणांनी आत्महत्या केली. यात ३१ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे. तर, याच कालावधीत पश्चिम रेल्वेवर १७ जणांनी आत्महत्या केली. यात १६ पुरूष आणि १ महिलेचा समावेश आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक आत्महत्या कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या असून तेथे २० जणांनी आत्महत्या केली आहे. तर, पश्चिम रेल्वेवर पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १२ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

हेही वाचा : अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना अटक

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषाची संख्या अधिक आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न महिलाही करतात. मात्र, आत्महत्या करण्यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. पुरुष रेल्वे रूळांवर झोपून किंवा धावत्या लोकल, एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या करतात. तर, महिला हाताची नस कापून, औषधाची अतिरिक्त मात्रा घेऊन आत्महत्या करतात. रेल्वे मार्गावर धावत्या गाडीसमोर उडी मारून आत्महत्या करण्यात महिलांचे प्रमाण कमी आहे.

डॉ. युसिफ माचिसवाला, मानसोपचार तज्ञ

आत्महत्येमुळे रेल्वेचा कारभार विस्कळीत

अनेक वेळा तांत्रिक बिघाडामुळे लोकलचा खोळंबा होतो. तर अनेक वेळा कोणताही तांत्रिक बिघाड, अपघात झाला नसताना देखील लोकल विलंबाने धावत असते. लेटलतीफ कारभारामागे आत्महत्येच्या घटना हे एक कारण आहे. धावत्या रेल्वेसमोर उडी मारणे, ओव्हरहेड वायरला स्पर्श करणे, धावती रेल्वे पाहून रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याच्या घटना घडतात. या घटनांचा फटका लोकल सेवेला बसत असल्याचे उघडकीस आले आहे. तणावग्रस्त व्यक्ती आत्महत्येसाठी सोपा मार्ग म्हणून धावत्या लोकल समोर उडी मारण्याचा पर्याय निवडतात. आत्महत्या केल्यानंतर संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला कळायला, कामगारांमार्फत तेथील मृतदेह उचलण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे आत्महत्येच्या एका घटनेमुळे त्या दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल विलंबाने धावतात. लोकल शेवटच्या स्थानकात पोहचण्यास, तेथून पुन्हा दुसऱ्या स्थळी जाण्यास विलंब होतो. त्यामुळे आत्महत्येच्या प्रकरणामुळे रेल्वे विस्कळीत होते.

हेही वाचा : घाटकोपरमधील महाकाय फलक दुर्घटना : जामिनासाठी अजब दावा करणाऱ्या भावेश भिंडेच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

१ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ५१ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. यात ४७ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. तसेच मध्य रेल्वेवर ३४ जणांनी (३१ पुरुष आणि ३ महिला), तर पश्चिम रेल्वेवर १७ जणांनी आत्महत्या (१६ पुरुष आणि १ महिला) केली.

१ जानेवारी ते ३० जून २०२३ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ५० आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद झाली. यात ४१ पुरूष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तसेच मध्य रेल्वेवर ३३ जणांनी (२७ पुरुष आणि ६ महिला), तर पश्चिम रेल्वेवर १७ जणांनी आत्महत्या (१४ पुरुष आणि ३ महिला) केली.

हेही वाचा : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : १६ हजार ५७५ पैकी केवळ ७ हजार ५२९ रहिवासी पात्र

कल्याण, पालघरमध्ये सर्वाधिक आत्महत्या

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व पोलीस हद्दीत कल्याण आणि पालघरमध्ये सर्वाधिक आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. जानेवारी – जून २०२३ या कालावधीत कल्याणमध्ये १४ आणि पालघरमध्ये ८ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर, याच कालावधीत यावर्षी कल्याणमध्ये २० आणि पालघरमध्ये १२ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून यंदा कल्याण, पालघर पोलीस हद्दीत आत्महत्ये प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An average of three to four suicides per day on central and western railway lines mumbai print news css
Show comments