उपनगरीय रेल्वेबरोबरच आता मुंबईची जिवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढलेली प्रवासी संख्या आणि विनावाहक बस सेवेतील नियोजनाचा अभाव यामुळे अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करू लागले आहेत. या फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. बेस्टने २०१९ पासून आतापर्यंत बसमधून विनितिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल एक लाख १३ हजार २७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये दंड वसूल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबईमध्ये गोवरची साथ,८४ रुग्णांची नोंद; गोवंडीमध्ये सर्वाधिक बाधित,पालिकेची सर्वेक्षण मोहीम

करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर आली आणि बेस्ट बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली. सध्या दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी बेस्टमधून प्रवास करीत आहेत. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी काही प्रवासी सराईतपणे हातानेच खूणावून ‘पास’ असल्याचे सांगून निसटण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर गर्दी असलेल्या बसमध्ये दरवाज्याजवळ उभे राहून प्रवासी तिकीट न काढताच आपल्या थांब्यावर उतरून निघून जातात. फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीस करीत असतात. मात्र तिकीट तपासनीसांचे संख्याबळ, बस आणि थांब्यांची संख्या लक्षात घेता सर्वच फुकट्या प्रवाशांना पकडणे बेस्टला शक्य होत नाही.
बेस्ट प्रशासनाने सुरू केलेल्या विनावाहक सेवेचा काहीजण गैरफायदा घेत आहेत. बेस्ट उपक्रमाने ऑक्टोबर २०१९ मध्ये १३ मार्गांवर विनवाहक बस सेवा सुरू केली. सध्या ६५ मार्गांवर विनावाहक बस सेवा सुरू आहे. या बसमध्ये वाहक नसतात. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस थांब्यांवर उभ्या असलेल्या वाहकांकडून तिकीट देण्यात येते. मधल्या थांब्यांवर गर्दीच्या वेळी काही प्रवासी वाहकाची नजर चुकवून बसमध्ये प्रवेश करतात व सर्रास विनातिकीट प्रवास करतात. काही वेळा बस थांब्यांवर वाहक उपलब्ध नसल्याने शेवटचा थांबा येईपर्यंत प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आणखी भर पडते.

हेही वाचा >>>सेंच्युरी मिल संक्रमण शिबीर दुर्घटनेची चौकशी; एमएमआरडीएने सल्लागाराकडून मागविला अहवाल

बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ पासून आतापर्यंत एक लाख १३ हजार २७९ विनातिकीट प्रवाशांवर तिकीट तपासनीसांमार्फत कारवाई करण्यात आली. २०१९ मध्ये ३७ हजार ९६४ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली होती. जानेवारी – नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २७ हजार ७८९ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. गेल्या चार वर्षांत केलेल्या कारवाईतून ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून दंडापोटी एक प्रवासभाडे आणि किमान १०० रुपये वसूल करण्यात येतात.

विनावाहक सेवामध्ये घट
सप्टेंबर २०२२ मध्ये ११० मार्गांवर विनावाहक बस सेवा सुरू होती. आता ही संख्या ६५ झाली आहे. चालकांची कमतरता आणि विनावाहक सेवामुळे फुकट्या प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन काही मार्गांवर विनावाहक बस कमी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>मुंबई:व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधातील गुन्ह्याचे प्रकरण;ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात सहभाग नाही

नियोजनाचा अभाव
काही मार्गांवर विनावाहक बस सेवा चालवताना बेस्ट उपक्रमला योग्य प्रकारे नियोजन करता आलेले नाही. एखाद्या थांब्यावर वाहक नसल्यास पुढील थांब्यावर उपलब्ध असलेल्या वाहकाकडून बसमधील प्रवाशांना तिकीट काढावे लागते. त्यावेळी प्रवाशांना आसन सोडून पुन्हा बसच्या दरवाजाजवळ जाऊन वाहकाकडून तिकीट घ्यावे लागते. तिकीट काढण्यासाठी दरवाजाजवळ गेलेल्या प्रवाशांच्या आसनावर अन्य प्रवासी बसतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये वाद होतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An increase in the number of free passengers traveling without tickets on best buses in mumbai print news amy
Show comments