Anant Ambani & Radhika Merchant Wedding: अनंत आणि राधिका अंबानी यांचा शाही विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच आटोपला. या लग्नसोहळ्यातला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. शांतेरी नागेश नायक या ७५वर्षीय आजींना अनंत आणि राधिका वाकून नमस्कार करताना व्हीडिओत दिसतात. आमच्याकडे दर वीकेंडला तुमच्याकडून पार्सल येतं असं अंबानी कुटुंबीय त्या आजींना सांगताना दिसतात. कोण आहेत या आजी? या आजी आहेत कॅफे म्हैसूरच्या कर्त्या. हा व्हीडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचल्यानंतर कॅफे म्हैसूरमधलं वातावरण आनंदमय आहे. लग्नाहून परतल्यानंतर आजींचं हॉटेलमध्ये दिमाखात स्वागत झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९३६ मध्ये सुरू झालेलं कॅफे म्हैसूर हे मुंबईतल्या सगळ्यात जुन्या उडुपी हॉटेलांपैकी एक आहे. दाक्षिणात्य बहुल वस्ती असलेल्या माटुंग्यात कॅफे म्हैसूर वसलं आहे. खवैय्यांचा सतत इथे राबता असतो. हलक्या आणि मऊसूत इडल्या, वाफाळतं सांबार, खमंग म्हैसूर मसाला डोसा, रस्सम आणि जिभेवर चव रेंगाळत राहील असा शिरा हे खाण्यासाठी अख्ख्या मुंबईतून खवैय्ये मंडळी इथे हजर होतात.

कॅफे म्हैसूरची आणि पर्यायाने ते चालवणाऱ्या कर्त्या मंडळींची कहाणी प्रेरणादायी अशी. स्वातंत्र्यपूर्व काळात तरुण रामा नायक यांनी मंगलोरहून मुंबईला येणारं जहाज पकडलं. त्यावेळी त्यांच्या अंगावर शर्टही नव्हता. तोच माणूस काही वर्षात मुंबईतल्या अनेक दाक्षिणात्य उपाहारगृहांचा मालक झाला.

राधिकाचं कन्यादान आणि भावनिक झालेल्या नीता अंबानी, ‘शाही सोहळ्या’त काय घडलं?

वडिलांचं छत्र गमावल्यानंतर रामा नायक आईसह मुंबईत आले. रामकृष्ण आश्रमात ते राहिले. राहण्याच्या बदल्यात ते तिथे स्वयंपाक करत असत. काही वर्षात त्यांनी आचारी म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांचं लग्नही झालं आणि ते ब्राह्मणवाडा इथे राहायला गेले. ते त्यांच्या कामात एवढे निपुण होते की मालकही त्यांच्या कामाची स्तुती करत असत अशी आठवण शांतेरी सांगतात. शांतेरी या रामा नायक यांच्या स्नुषा. ‘आमचं लग्न झालं तेव्हा रामा नायक हे प्रसिद्ध नाव होतं. १९४२ ते १९६० या कालावधीत त्यांनी मुंबईतली अनेक हॉटेलं चालवायला घेतली’, असं शांतेरी सांगतात.

कॅफे म्हैसूर तेव्हा धडपडलेल्या स्थितीत आणि छोटंसं होतं. रामा नायक यांनी त्यांचा कायापालट केला. १९७३-७४ मध्ये त्यांनी हॉटेलची धुरा नागेशकडे सोपवली. शांतेरी यांचे पती नागेश हे व्हीजेटीआयमधून शिक्षण घेतलेले इंजिनियर. त्यांनी हॉटेलचा पसारा आणखी वाढवला.

‘ते अतिशय द्रष्टे होते, त्यांच्या डोक्यात असंख्य कल्पना असत. ग्राहकांना चांगल्या पद्धतीने पदार्थ देता यावेत यासाठी त्यांनी तीन खणांच्या प्लेट वापरणं सुरू केलं. भांडी घासण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली. जेवण तयार करण्यासाठी बॉयलर्स आणले. जागेचा नीट उपयोग यावा यासाठी जिन्याची रचना केली. ८०च्या दशकात हॉटेलचं नूतनीकरण झालं’, असं नागेश यांचे चिरंजीव नरेश नायक सांगतात. ४४वर्षीय नरेश सध्या हॉटेलचे मालक आहेत.

रोज १६ तास महिनाभर रेखाटत होत्या राधिकाचा शाही लेहेंगा! ‘या’ अवलिया चित्रकार जयश्री बर्मन कोण?

‘२००९ मध्ये बाबा गेले तेव्हा आईने हॉटेलची सूत्रं ताब्यात घेतली. मंगलोरमधल्या पहिल्या पदवीधर स्त्रियांपैकी ती एक आहे. आई आणि माझी बहीण नेहा यांनी हॉटेलचा व्याप बरीच वर्ष सांभाळला. कोव्हिड काळात मी हॉटेलचं काम पाहू लागलो’, असं नरेश सांगतात. त्यांनी डिजिटल किऑस्क बसवला. नरेश यांनी हॉटेलात काळानुरूप बदल केले.

कॅफे म्हैसूर आणि अंबानींचा ऋणानुबंध

वडिलांकडे हॉटेलची सूत्रं असताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी विद्यार्थी असताना हॉटेलात येत असत. तेव्हा ते केमिकल टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत होते. ते अगदी नियमितपणे हॉटेलात येत असत. नरेश यांनी यासंदर्भात आठवण सांगितली. ‘मी तेव्हा सात वर्षांचा होतो. मॅनेजरच्या मांडीवर बसायचो. टीव्हीवर दिसणारी दोन माणसं समोरच्या टेबलवर बसलेले ते दाखवायचे. ती दोन माणसं म्हणजे मुकेश आणि अनिल अंबानी. टीव्हीवर दिसणारी माणसं आता हॉटेलमध्ये कशी असा प्रश्न मला पडायचा’, अशी आठवण नरेश हसून सांगतात.

मुकेश अंबानी घरच्यांबरोबर हॉटेलमध्ये आलेले असतानाचा एक किस्साही त्यांनी सांगितला. ‘मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि त्यांची तीन मुलं हॉटेलात आले होते. जेव्हा त्यांचं जेवण झालं स्टाफची त्यांची गाडीपर्यंत नेण्याच्या व्यवस्था करण्याची गडबड उडाली. पण मुकेश आणि नीता अंबानी शांतपणे बाहेर पडले. त्यांनी शंभर रुपयांची नोट बाहेर काढली. मुलांसाठी फुगे खरेदी केले. मुकेश अंबानी तेव्हा जसे होते तसेच आताही आहेत. ते सर्वांना समानतेने वागवतात. त्यांची मुलंही अशीच आहेत. आम्ही लग्नाला गेलो तेव्हा त्यांनी आईला वाकून नमस्कार केला. त्यांनी आईशी ज्या पद्धतीने संवाद साधला ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले’.

आजही वीकेंडला कॅफे म्हैसूर मधून अँटिलियात पार्सल जातं. संपूर्ण लग्नसोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी रिलायन्सव्यतिरिक्त केवळ एका ब्रँडचं नाव घेतलं, ते म्हणजे कॅफे म्हैसूर असं नरेश अभिमानाने सांगतात. ‘कालौघात मुंबईतली अनेक उडुपी हॉटेलं बंद झाली. कोव्हिड काळात आम्हाला मोठा फटका बसला. त्यातून सावरणं सोपं नव्हतं. आजही सगळं पूर्वपदावर आलेलं नाही. आमचा बॉयलर सकाळी ६ ते रात्री १० सुरू असतो. इडलीपात्रातून ताज्या वाफाळत्या इडल्या भराभरा प्लेटमध्ये भरून ग्राहकांना दिल्या जातात. इडली ही आमची खासियत आहे. दररोज हजारो इडल्या तयार होतात आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरतात’, असं नरेश सांगतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant mukesh ambani nita ambani referring to cafe mysore in wedding ceremony respects shanteri nayak who is owner of cafe mysore south indian udupi restaurant famous for idli d
Show comments