मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे असतानाच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले. ठाकरे यांच्या पत्रावर पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवापर्यंत आहे.

या मतदारसंघात शिवसेनेच्या ऋुतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे सांगत पवार यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी हा निर्णय सुसंगत ठरेल. यामुळेच भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नव्हता याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. तसेच विधानसभेचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला संधी द्यावी, अशी विनंतीही पवार यांनी केली.

गांभीर्याने विचार करू – फडणवीस

ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठविले असले तरी आता शेवटच्या क्षणी काही भूमिका घ्यायची असेल तर एकटय़ाला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे, वरिष्ठांशी बोलावे लागणार आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ िशदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चेअंती घेतला जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रताप सरनाईक यांचेही पत्र

‘बाळासाहेबांची शिवसेने’चे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

राज ठाकरे यांचे पत्र

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेत, भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली. राज यांनी मात्र भाजपची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपची कोंडी केली आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असे आवाहन केले. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून पवारांचे आभार

महाराष्ट्राचे राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारित असून, शिवसेनेने त्याची सदैव जपणूक केली. यातूनच गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, गिरकर ताई यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले नव्हते याची आठवण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला करून दिली आहे.  निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भात आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा दाखविला आहे. यासाठी शिवसेना सदैव पवारांचे आभारी राहील, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव यांच्याकडून विनंती नाही

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून  शरद पवार, राज ठाकरे यांनी भाजपला आवाहन केले. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे  मतप्रदर्शन केलेले नाही. तसेच उद्धव ठाकरे यांच्या आवाहनात तसा काही उल्लेख नाही, असे भाजपच्या वतीने सांगण्यात येते.  राजीव सातव व शरद रणपिसे यांच्या निधनानंतर झालेल्या राज्यसभा किंवा विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी  फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली होती. शिवसेनेनेकडून अशी  विनंती करण्यात आलेली नाही याकडे भाजपचे नेते लक्ष वेधत आहेत.

भाजपची सावध खेळी

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपने सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते. अंधेरीत शिवसेनेचा विजय झाल्यास त्याचा आगामी मुंबई पालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. शिवसेनेचे नैतिक बळ तर वाढेलच पण मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. भाजपले हे टाळायचे आहे. अंधेरीत यशाबद्दल भाजपचे नेते साशंकच आहेत. यामुळेच अंधेरीबाबत भाजपमध्ये वेगळा मतप्रवाह असल्याचे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andheri east bypolls sharad pawar raj thackeray appeal bjp to withdraw candidate zws
First published on: 17-10-2022 at 01:11 IST