लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई: थोड्याशा पावसातही पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेला अंधेरी सबवे यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २८ वेळा वाहतूकीसाठी बंद ठेवावा लागला होता. पंधरा मिनिटे ते चार तास वाहतूक बंद ठेवावी लागली होती. गेल्यावर्षी हा भूमिगत मार्ग संपूर्ण पावसाळ्यात २१ वेळा बंद ठेवावा लागला होता. अंधेरी सबवेमधील पूरस्थितीवर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नसून या ठिकाणी हिंदमाता आणि मिलन सबवे प्रमाणे भूमिगत टाकी बांधावी अशी सूचना आमदार अमित साटम यांनी केली आहे. मुसळधार पाऊस पडला की पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंधेरी सबवेचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडत असताना व भरतीची वेळ असताना मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जिवित तसेच मालमत्तेची हानी होते. तसेच हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. त्यामुळे पालिकेने या भूमिगत मार्गाजवळील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमताही वाढवण्यात येणार असून काही ठिकाणी नाले वळवले जाणार आहेत. मात्र गोखले पुलाच्या कामामुळे अंधेरी सबवेची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यातच अंधेरी सबवे परिसरात मलनिस्सारणाचे पाणीही येत असल्यामुळे थोड्याशा पावसातही हा सबवे पाण्याखाली जातो. वाहने आत अडकून पडतात. त्यामुळे ताबडतोब सबवेतील वाहतूक बंद करावी लागते. हेही वाचा >>>पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर,पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार १ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी नुकतीच अंधेरी भूमिगत मार्गाची पाहणी केली. पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या पुरपरिस्थिती कारणांचा अभ्यास करण्यासाठी पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांसह त्यांनी नुकतीच अंधेरी सबवेला भेट दिली. या भेटीनंतर साटम यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना सविस्तर पत्र लिहून पुराची कारणे आणि त्या समस्येवर उपाय सुचवले आहेत. मायक्रो-टनेलिंग अर्थात पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याच्या विविध कामांवर ६०० कोटी रुपयांचा खर्च करणे हे व्यवहार्य नसल्याचे साटम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भुयारी मार्गात पाणी साचते असे मत साटम यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पालिकेने अंधेरी पूर्वेकडील बाजूस जमिनीच्या खाली किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा रस्त्याच्या खाली एक भूमिगत टाकी बांधावी. ज्यामुळे पूर्वेकडून पावसाचे येणारे पाणी हे मिलन सबवे प्रमाणे भूमिगत टाकीमध्ये जमा होईल, अशी सूचना साटम यांनी केली आहे. हेही वाचा >>>विकासकाची तयारी असल्यास झोपु योजनेत ३०० चौ. फुटांपेक्षा मोठे घर! तसेच एस व्ही रोडवरील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवणे, पूर्वेकडील सांडपाणी पाणी कमी करण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढवणे, आणि मिलियनेअर बिल्डिंगपासून सुरू होणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण करणे अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत. वरील उपाययोजना केल्यास अंधेरी सबवे (भुयारी मार्ग) येथे पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. हे फार मोठा खर्च न करताही होईल आणि त्यामुळे जनतेचा पैसा वाचेल. त्याच वेळी नागरिकांना दिलासाही मिळेल, असे मत साटम यांनी व्यक्त केले आहे.