लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षांतील काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केले नाही किंवा महाविकास आघाडीसाठी काम केले, अशा तक्रारींचा पाढा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेचे जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्याने प्रचारास अवधी मिळाला नसल्याने आता विधानसभेसाठी जागावाटप आणि उमेदवारनिश्चिती लवकर व्हावी, अशी मागणीही प्रदेशातील नेत्यांनी वरिष्ठांकडे केली.

भाजपचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह प्रदेश विस्तारित समितीतील नेत्यांची गुरुवार-शुक्रवारी बैठक झाली. यात मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेली मते, अडचणी व वाद, आमदार, पदाधिकारी व नेत्यांच्या भूमिका आणि त्यांनी काम केले किंवा नाही, राजकीय परिस्थिती, जिंकून येऊ शकेल असे संभाव्य उमेदवार आदी मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या, २१ जुलैपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार

भाजपच्या प्रदेश नेत्यांनी शिंदे व पवार गटातील नेत्यांनी योग्य प्रकारे काम न केल्याच्या आणि विरोधात काम केल्याच्याही तक्रारी केंद्रीय नेत्यांकडे केल्याचे समजते. मात्र बावनकुळे यांनी याचा इन्कार केला. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती व अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यातील प्रत्येक निवडणूक केंद्रापर्यंत पक्षाची प्रचार यंत्रणा, केंद्र व राज्य सरकारचे निर्णय, राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना व निर्णयांचा प्रचार, त्यांचे लाभ व माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीचे नियोजन आदी बाबींवर आणि पुणे येथे रविवारी होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीसाठी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

कुणामुळे कुठे फटका?

अजित पवार गटातील काही नेत्यांमुळे दिंडोरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर व बुलढाण्यात फटका बसल्याची तक्रार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

●शिंदे गटातील नेत्यांमुळे जालना व पालघरमध्ये फटका बसल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे.

●उपाययोजना न केल्यास विधानसभा निवडणुकीतही फटका बसेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

बैठकीत पवार व शिंदे गटातील नेत्यांबाबत भाजप नेत्यांनी कोणत्याही तक्रारी केलेल्या नाहीत. महायुतीतील पक्षांमध्ये भांडणे लावण्यासाठी हा अपप्रचार केला जात आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप