मुंबई : पशुसंवर्धन आयुक्तालयाने टॅगिंग (कानात बिल्ले मारणे) करूनच पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश प्रगणक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. शिवाय प्रगणकांची संख्या तोकडी आहे. प्रगणकांना पुरेसे प्रशिक्षणही दिलेले नाही, त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या २१ पशुगणनेचे काम रखडले आहे. सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी गंभीर दखल घेऊन फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात २५ ऑक्टोंबरपासून पशुगणना सुरू झाली. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे २५ नोव्हेंबर पशुगणना सुरू झाली आहे. मुळात पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळाची वानवा आहे. त्यात जनावरांचे टॅगिंग करण्याचे कामही रखडले आहे. आयुक्तालयाने जनावरांचे टॅगिंग करूनच पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय बहुतांश प्रगणक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना पुरेसे प्रशिक्षणही मिळालेले नाही. त्यामुळे पहिले महिना – दीड महिना अडखळत गणना सुरू होती. आता पशुगणनेने गती घेऊन सुमारे ४२ टक्के गणना पूर्ण झाली आहे.

हेही वाचा – कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज

यंदाची २१ वी पशुगणना पहिल्यादांच मोबाईल ॲपद्वारे होत आहे. राज्यातील ४४ हजार ४७० गावे आणि ७ हजार ९२२ प्रभाग, असे एकूण ५२ हजार ३९२ ठिकाणी गणना सुरु आहे. त्यासाठी ७ हजार ७४९ प्रगणक आणि १ हजार ४२४ पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत जेमतेम ४० टक्के गणना झाली होती. गुरुवारपर्यंत (२३ जानेवारी) गणना ४२ टक्क्यांवर गेली आहे. गुरुवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी आढावा बैठक घेऊन पशुगणनेला गती देऊन फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

पशुगणनेसाठी ग्रामीण भागात प्रत्येक तीन हजार कुटुंबाला एक प्रगणक तर शहरी भागासाठी प्रत्येक चार हजार कुटुंबाला एक, अशी प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. गाव आणि प्रभागांच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे प्रगणकांवर कामाचा ताण येऊन गणना करण्यास विलंब होताना दिसत आहे. मोबाईल ॲपद्वारे गणना सुरू असल्यामुळे मोबाईला नेटवर्क असणे गरजेचे आहे. दुर्गम, डोंगराळ भागात मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे प्रगणकांना ऑफलाइन माहिती संकलित करून नेटवर्क असलेल्या ठिकाणी येऊन ॲपमध्ये समाविष्ट करावी लागत आहे.

हेही वाचा – मुंबई : दूरस्थ शिक्षणापासून विद्यार्थी दूर, यंदा १६ अभ्यासक्रमांसाठी अवघे २४ हजार ८९४ विद्यार्थी

फेब्रुवारी अखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश

राज्यात सुरू असलेली २१ पशुगणना प्रारंभी रखडली होती. आता पशुगणनेतील अडथळे दूर करून फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal husbandry commissionerate tagging cattle census order mumbai print news ssb