रविवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडलेल्या गटाध्यक्षांच्या मेळाव्या बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेच्या तब्बेतीवरून केलेली टीका ही त्यांना न शोभणारी असल्याचे ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अजित पवार म्हणाले, “ओठात एक आणि…”

काय म्हणाले अरविंद सावंत?

“उद्धव ठाकरे मुख्ममंत्री असताना करोना होता, हे सर्व जगाला माहिती आहे. त्यावेळी कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री बाहेर फिरत नव्हते, पंतप्रधानही बाहेर फिरत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे, त्याकाळात अनेक सर्वेक्षणं केली जात होती. या सर्वेक्षणांमध्ये देशात उत्तम मुख्यमंत्री कोण? तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे नाव सातत्याने समोर येत होते. त्यावेळी त्यांनी कधी कौतुक केल्याचं मला आठवत नाही. चांगल्याला चांगलं म्हणावं हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये जेव्हा नदीत मृतहेद तरंगत होती, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला ऑक्सिजन कसा मिळेल, यावर उद्धव ठाकरे काम करत होते. त्यावेळी केंद्र सरकारही मदत करत नव्हते, अशा अनेक समस्यांवर मात करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवले”, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.

हेही वाचा – ‘जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले “एक वेगळीच हिंमत…”

“करोना काळात कमी वेळेत टास्क फोर्स, रुग्णालयं स्थापन करण्यात आली. त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालयासह जागतिक आरोप संघटनेनेही केले होते. या गोष्टींचा तुम्हाला अभिमान वाटायला नको का?”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंनी जी भूमिका घेतली, ती भूमिका म्हणजे…”; संजय राऊतांचं विधान!

“ज्या डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंवर उपचार केले, कधी त्यांची मुलाखत घेऊन बघा. तेव्हा तुम्हाला कळेल, की उद्धव ठाकरे किती मोठ्या आजारातून बाहेर आले. इतक्या मोठ्या आजारावर मात करून ते आता बाहेर पडत आहेत. याचे त्यांना दुख आहे का? त्यामुळे राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टीका केली ती त्यांना न शोभणारी आहे”, अशी प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind sawant replied to raj thackeray criticism on uddhav thackeray health spb