मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुंबईतील राजकीय फलक, बॅनर, भित्तीपत्रके काढण्याच्या कार्यवाहीला वेग आला आहे. अनुज्ञापन विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत संपूर्ण मुंबईतून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे आदी निष्कासित करण्यात आले आहेत. ही कारवाई १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलक निष्कासन कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. आचारसंहिता कालावधीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नये. ज्याठिकाणी अनुज्ञेय नाही त्याठिकाणी विहित परवानगी प्राप्त करूनच जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा – दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्केपेक्षा जास्त नको…

नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आचारसंहितेच्या कालावधीत संपूर्ण मुंबईत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स इत्यादी प्रचार साहित्यावर निष्कासन कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिश शर्मा यांनी केल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत मुंबईतील भित्तीपत्रके (९४२), फलक (८१७), कटआऊट होर्डिंग (५९६), बॅनर्स (३७०३), झेंडे (१३३१) आदी मिळून ७ हजार ३८९ साहित्य अनुज्ञापन खात्याने निष्कासित केले आहे. अनुज्ञापन खात्याच्या पथकामार्फत महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये सातत्याने अशा पद्धतीच्या साहित्यावर निष्कासन कार्यवाही करण्याची सूचना उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी केल्या आहेत.

हेही वाचा – धारावी पुनर्विकास प्रकल्प : पोटमाळ्यावरील घरांच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली डीआरपीपीएलकडून आमिष

तक्रारीवर १०० मिनिटात कारवाई

भारतीय निवडणूक आयोगाने ‘Cvigil App’ या ॲपच्या मदतीनेही मतदारांना आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांत करण्यात येते. त्याशिवाय मतदारांना १९५० या हेल्पलाईन क्रमांकाचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.