लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या आशा सेविका व आरोग्य सेविकांनी मुख्यमंत्र्याच्या भेटीशिवाय माघार नाही असा पवित्रा घेतला आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भेटीसंदर्भात केवळ तारीखा देण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये सायंकाळपर्यंत वेळ मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी थेट दोन दिवसांनंतरची वेळ भेटीसाठी मिळेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशा सेविका आणि आरोग्य सेविका आक्रमक झाल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या दोन हजार आशा सेविका व चार हजार आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले होते. आयुक्तांनी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासोबत बुधवारी आंदोलकांना चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार तब्बल दोन तास झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आशा सेविका व आरोग्य सेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेतला होता.

आणखी वाचा-मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ऑनलाईन सट्टा

मात्र आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवशी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात येत होते. मात्र तिसऱ्या दिवशी थेट दोन दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळेल, असे सांगण्यात आले आहे. परंतु याबाबतही कोणतेही निश्चित आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून फक्त आश्वासनावरच बोलवण होत असल्याची टीका आशा व आरोग्य सेविकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आशा सेविका व आरोग्य सेविकांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. तिसऱ्या दिवशी आशा व आरोग्य सेविकांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले असल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आणि म्युनिसिपल आशा सेविका युनियनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी दिली.