दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रविवारी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी आपकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. अशात भाजपा नेते आशिष शेलार यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या मद्यधोरणावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंचा सपशेल गौतमभाई अदानीच झालाय”, ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणे, “असे ‘मोदीछाप’ विधान…!”

काय म्हणाले आशिष शेलार?

“ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. तत्कालिन राज्य सरकारने विदेशी दारुवरील कर माफ केला होता. तसेच बार आणि पबच्या परवाना शुल्कातही सवलत देण्यात आली होती. किराणा दुकानात वाईन विकण्याची परवानगीही या सरकारने दिली होती”, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

“…म्हणूनच केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले?”

पुढे बोलताना, “दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत आहेत का? महाराष्ट्रातही जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार का? आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते का?” असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले आहेत.

Story img Loader