मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार. दोघांच्याही अभिनयाची जातकुळी वेगळी, ढंग वेगळा, बाज वेगळा… ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते या दोघांचाही स्वतंत्र चाहतावर्ग आहे. सहज अभिनयाच्या जोरावर कुठलीही भूमिका पेलून नेणाऱ्या या दोन्ही कलाकारांमध्ये आजही एक वेगळीच ऊर्जा आहे, चैतन्य आहे. त्यामुळे त्या दोघांना पडद्यावर एकत्र आणत, त्यांच्या वयाच्या अनुषंगाने आजच्या घडीच्या एका महत्त्वाच्या विषयावरची रंजक गोष्ट पाहण्याची पर्वणी लोकेश गुप्ते लिखित – दिग्दर्शित, ‘अशी ही जमवाजमवी’ या चित्रपटाने दिली आहे.
कुठल्याशा निमित्ताने झालेल्या भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या मोहन आणि वंदना यांची ही गोष्ट आहे. इथे हे आयुष्यातलं पहिलं, नवथर प्रेम नाही. दोघंही आयुष्याचं सांजपर्व सुखाने अनुभवताहेत. मुलं-नातवंडं यांच्या संसारात रमले आहेत, पण आता दोघांनाही एकत्र येऊन आपली प्रेमाची गोष्ट पूर्ण करायची आहे. आता मुलांच्या संसारातून बाहेर पडून उर्वरित आयुष्य त्यांना एकत्र अनुभवायचं आहे, मात्र हे घरच्यांना सांगायचं कसं? हा या दोघांसमोरचा यक्षप्रश्न. आजी-आजोबांच्या पिढीला नेहमीच त्यांच्या मुलांपेक्षा नातवंडांचा आधार अधिक वाटतो. नातवंडं आपल्याला समजून घेऊ शकतील, असा त्यांचा दृढ विश्वास असतो. नातवंडांचा हात हातात घेऊन दोघंही स्वतंत्रपणे गोव्यात पोहोचतात आणि तिथून त्यांच्या प्रेमाच्या गोष्टीची सुरुवात करतात. या दोघांमध्येही असलेलं प्रगल्भ, तितकंच गोड, अवखळ प्रेमाचं, विश्वासाचं, समजुतीचं नातं घरच्यांच्याही मनाला भिडतं का? त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुफळ संपूर्ण होते का? त्यात कुठली विघ्नं येतात? हे दोघंही अतिशय संयततेने समोर आलेली परिस्थिती कशी हाताळतात?, याची गमतीशीर गोष्ट ‘अशी ही जमवाजमवी’ या चित्रपटात पाहायला मिळते.
‘अशी ही जमवाजमवी’ या चित्रपटाची गंमत त्याच्या विषयापेक्षाही त्यातल्या कलाकारांच्या अभिनयात अधिक आहे. मुलांचं शिक्षण, त्यांना मोठं करणं, त्यांचा घरसंसाराचा गाडा व्यवस्थित लावून दिल्यानंतर, सगळ्या जबाबदाऱ्यांतून मुक्त झाल्यानंतरही दोन प्रौढ, वयस्कर व्यक्तींना स्वत:साठी निर्णय घेता येत नाही. त्यातही ती स्त्री असेल तर… तिची कुचंबणा अधिक होते. जोडीदार निघून गेला असला तरी तिचा निर्णय घेताना तिला मुलांचा विचार घ्यावा लागतो. अनेकदा हे बंध मायेचेही असतात, केवळ विरोधाला विरोध होतोच असं नाही… वंदना या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हा विषय पुढे ठेवताना एखादी स्त्री पुनर्विवाहाचा निर्णय घेत असेल तर ती तिच्यासाठी आजही तितकी सहज गोष्ट नाही, हे लेखक – दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी दाखवून दिलं आहे. अर्थात, चित्रपटाचा विषय जरी काहीसा प्रगल्भ दृष्टिकोन, विचारांची मागणी करणारा असला तरी त्याची मांडणी दिग्दर्शकाने हलकीफुलकी ठेवली आहे.
कौटुंबिक निखळ मनोरंजनाचं सूत्र कुठेही हलू न देता त्याची मांडणी केली आहे. त्यामुळे भारंभार पात्रं न घेता, मोजकीच पात्रं आणि त्यासाठी उत्तम कलाकार अशी मोट बांधत अभिनयातून हा विषय अधिक रंगतदार करण्याच्या प्रयत्नामुळे कुठेही उपदेशपर अभिनिवेश चित्रपटात नाही. अर्थात, जोडीदार नसल्याने काहीशा एकट्या पडणाऱ्या आईला वा वडिलांना जोडीदाराची गरज भासू शकते, हा विचारच आजच्या पिढीच्याही मनाला शिवत नाही. आपल्या जगण्याच्या घाईत त्यांच्याकडे होणारं दुर्लक्ष हीच इतकी सहज गोष्ट असते की जेव्हा त्यांच्याकडून असा काही विचार पुढे येतो तेव्हा आमच्या पिढीची पहिली प्रतिक्रिया ही मानसिक धक्क्याची असते. त्यामुळे ही सगळी क्रिया-प्रतिक्रिया मांडताना दिग्दर्शकाने ओघाओघात अनेक पैलूंकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
या वयातलं प्रेम हे आक्रस्ताळं नसतं. आयुष्यभराच्या अनुभवाने मनाचं गाठोडं पक्कं केलेलं असतं, त्यामुळे मोहन आणि वंदना ही दोन्ही पात्रं रंगवताना त्यांची मूळ व्यक्तिमत्त्वं, दोघांचीही कौटुंबिक चौकट, प्रेमातला आनंद शोधण्याबरोबरच मुलं निर्णयात सोबत नसतील तर इच्छा असूनही दूर राहण्याचा निर्णय घेण्याचं जपलेलं भान असे कैक पैलू संयतपणे मांडले आहेत. या संयत आणि तितक्याच हलक्याफुलक्या मांडणीला अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोघांच्या बहारदार अभिनयाची जोड मिळालेली असल्याने हा चित्रपट खरोखरच खुसखुशीत अभिनयाची पर्वणी ठरला आहे. सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारा, हसतमुख अशा मोहन कर्णिक यांच्या भूमिकेत अशोक सराफ चपखल बसले आहेत. तर काहीसा बेधडकपणा असतानाही वंदना गुप्ते यांनी साकारलेली वंदू ही वरवर मिश्कील, गमतीशीर वाटत असली तरी मुलं-नातवंडं सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि तरीही वेळ आली तर खमकेपणाने निर्णय घेणारी अशी त्यांची व्यक्तिरेखा अधिक भावते. या दोघांबरोबरच अभिनेता सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, चैत्राली गुप्ते, पुष्कराज चिरपुटकर या सगळ्यांनीच त्यांच्या छोटेखानी भूमिका कमालीच्या छान वठवल्या आहेत. तनिष्का विशे आणि ओमकार धनंजय कुलकर्णी या दोन नवोदित कलाकारांचीही त्यांना उत्तम साथ मिळाली आहे. निखळ मनोरंजन आणि खुसखुशीत अभिनयाची ही उत्तम जमवाजमवी आहे.
अशी ही जमवाजमवी
दिग्दर्शक : लोकेश गुप्ते
कलाकार : वंदना गुप्ते, अशोक सराफ, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, चैत्राली गुप्ते, पुष्कराज चिरपुटकर, तनिष्का विशे आणि ओमकार धनंजय कुलकर्णी.