आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या असून आगामी विधानसभेतही आम्ही २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असं मोठं विधान मनसे नेते बाळा नांदगावर यांनी केलं आहे. मुंबईतल्या रंग शारदा येथे पार पडलेल्या मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

हेही वाचा – राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण का नाही? सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर?

“आगामी विधानसभेसाठी आमची युतीसाठी कोणाशीही चर्चा सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

“ज्या मतदरासंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मतं मिळाली आहेत, त्या मतदारसंघात आम्ही निश्चित आमचे उमेदवार देऊ. त्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. मनसेचे पदाधिकारी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतील, तसेच त्यासंदर्भातील अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाईल”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी मनसे विधानसभा स्वबळावर का? असं विचारलं असता, “पुढे काय होईल हे आता सांगता येणार नाही. मात्र, आम्हाला तयारी तर करावीच लागेल. प्रत्येक जण हा आपला पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यानुसार आम्हीसुद्धा आमचा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करतो आहे”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंचं महत्त्वाचं आवाहन! मोदींना शुभेच्छा नाहीत, निकालांचं अभिनंदनही नाही, म्हणाले, “तमाम महाराष्ट्र…”

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यावरही भाष्य केलं. “आम्ही कोकण पदवीधरसाठी उमेदवार दिला होता. तिथे आमची २८ हजार मते होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन राज ठाकरेंनी उमेदवार मागे घेतला”, असं त्यांनी सांगितलं.