राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईत वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा असूनही त्यांच्यावर गोळीबार कसा झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता सुरक्षा अधिकाऱ्यांकडूनही संबंधित व्हीआयपी व्यक्तींबद्दलच तक्रारी करण्यात येत आहेत.

बाबा सिद्दिकींना हत्येच्या १५ दिवस आधीच वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. सुरक्षा रक्षक असतानाही त्यांच्यावर गोळीबार कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करत सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र, यासाठी काही प्रमाणात संबंधित व्हिआयपी व्यक्तीही जबाबदार असल्याची तक्रार या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय आहेत सुरक्षा दलाच्या तक्रारी?

बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन अँड सेक्युरिटी विभागाच्या बैठकीमध्ये या तक्रारींवर चर्चा झाली. व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले PSO अर्थात पर्सनल सेफटी ऑफिसर्स या बैठकीला हजर होते. त्यावेळी त्यांनी व्हीआयपी मंडळींना सुरक्षा पुरवताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. त्यात व्हीआयपी प्रवास करत असतात त्या कारमध्ये बसू न देणे, अचानक प्रवासाच्या मार्गांमध्ये, ठिकाणांमध्ये बदल करणे किंवा नियोजन बदलणे या बाबींचा समावेश आहे.

मंगळवारी ही बैठक झाल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी व्हीआयपी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार मांडली. “या अधिकाऱ्यांना काहीही झालं तरी संबंधित व्यक्तीसोबतच राहण्याचे आदेश दिलेले असतात. पण काही बाबतीत व्हीआयपी मंडळी सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत गाडीत बसू देत नाहीत. त्यांना दुसऱ्या गाडीत मागून येण्यास सांगितलं जातं. त्यांच्या गाडीत चालू असलेलं संवेदनशील संभाषण सुरक्षा अधिकाऱ्यांनी ऐकू नये हा यामागचा उद्देश असतो. पण यामुळे सुरक्षा पुरवण्याचा मूळ उद्देशच असफल होतो”, असं या अधिकाऱ्यानं नमूद केलं.

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या करणारा ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाही, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

काही वेळी व्हीआयपी व्यक्ती अशा व्यक्तीला भेटायला निघतात, जे त्यांच्या कार्यक्रमात नमूदच नसतं. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा यावर सुरक्षा अधिकारी सल्ला देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, अशीही तक्रार या अधिकाऱ्यांनी केली आहे. “जर एखाद्या अधिकाऱ्यानं आग्रहच केला, तर संबंधित व्हीआयपी व्यक्ती त्याच्याविरोधात तक्रार करून त्याची बदली करवून घेतात”, असा दावा या अधिकाऱ्यानं केला.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सुरक्षा अधिकारी सतर्क

दरम्यान, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर अशा व्हीआयपी व्यक्तींना दिलेल्या सुरक्षेवरील अधिकाऱ्यांना सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, यादरम्यान, संबंधित व्यक्तीने त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं, तरीदेखील त्यांच्या सुरक्षेलाच प्राधान्य देण्याची ताकीद या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.