लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ठाणे, नवी मुंबईकरांना नव्या प्रकल्पांची भेट दिली आहे. बदलापूर-नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून बदलापूर-नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० किमीच्या मार्गासाठी १०,८३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यास बदलापूर-नवी मुंबई अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे.

बदलापूर-नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्गाच्या प्रस्तावाला मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हा मार्ग प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई-बदलापूर आणि पुढे विरार-अलिबाग असाही अतिवेगवान प्रवास करता येणार आहे.

आणखी वाचा-गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठत्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश

बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि नवी मुंबईचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची, वाहनांची संख्या प्रचंड आहे. बदलापूर-नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांना प्रचंड वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो. तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमधील अंतर्गत रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने बदलापूर-नवी मुंबई दरम्यान २० किमीचा प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

शहराच्या अंतरभागाऐवजी बाहेरून वाहने जावीत, अंतर्गत रस्ते स्थानिकांसाठी, त्यांच्या वाहनांसाठी वापरले जावेत आणि शहरांतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी बदलापूर-नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आल्याचेही डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. मेट्रो आणि इतर वाहतूक प्रकल्पापेक्षा प्रवेश नियंत्रण मार्ग कमी खर्चिक आणि कमी वेळात पूर्ण होणारा पर्याय आहे. त्याचबरोबर हा मार्ग तब्बल आठ पदरी असल्याने त्याचा अधिक वापर होणार आहे. त्यामुळे पुढील सहा-सात वर्षांत बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचा दावा यानिमित्ताने त्यांनी केला आहे.

आणखी वाचा-प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन

ताशी ८० किमी वेगाची मर्यादा

बदलापूर-नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्ग ‘एमएसआरडीसी’च्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडला जाणार आहे. हा मार्ग नवी मुंबई विमानतळासह मुंबई-अहमदाबाद द्रुतगती महामार्ग, कल्याण वर्तुळाकार रस्ता (कल्याण रिंग रोड) या प्रकल्पांशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या, तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या २० किमीच्या मार्गावर वाहनांसाठी ताशी ८० किमी वेगाची मर्यादा असणार आहे.

भूसंपादनाचे मोठे आव्हान

बदलापूर-नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्गास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीस सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे हे मोठे आव्हान ‘एमएमआरडीए’समोर आहे. या प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर पाच वर्षांत मार्ग पूर्ण करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे.