मुंबई : शहरासह दोन्ही उपनगरांतील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. सुमारे १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात सुरू आहे. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झालीच पाहिजेत. काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा. काँक्रिटीकरण कामे अधिकाधिक गतीने पूर्ण व्हावीत, या दृष्टीने नियोजन करावे, अशी तंबी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिली. काँक्रिटीकरणाच्या कामांचा दर्जा, गुणवत्तेबाबत अजिबात तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही गगराणी यांनी ठणकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते), तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) अशा एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा १ मधील ७५ टक्के, तर टप्पा २ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामांचा गगराणी यांनी आढावा घेतला आणि यासंदर्भात आवश्यक कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या सूचना अभियंत्यांना केल्या. महानगरपालिकेने सर्व डांबरी, पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतल्यामुळे बहुतांशी ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ते विकास करताना खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, विनाकारण खोदकाम करून कामे प्रलंबित राहू नये, याची देखील खबरदारी अभियंत्यांनी घ्यावी, असे गगराणी यांनी सांगितले.

रस्ते विभागातील दुय्यम अभियंते, सहायक अभियंता यांनी दररोज प्रत्यक्ष कार्यस्थळावर गेलेच पाहिजे. नागरिकांच्या सोयीसाठी माहिती फलक, रस्ता रोधक उभारणे आवश्यक आहे. नवीन कामे हाती घेण्यापूर्वी विद्यमान काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी नमूद केले. जलअभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विविध विभागांना उपयोगिता सेवा वाहिन्या संबंधित कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांना देखील महानगरपालिकेच्या रस्ते विकास कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात आले आहे. एकदा काँक्रिटीकरणाची कामे झाली की कोणत्याही संस्थेस खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्णत्वाला नेण्याकामी अभियंत्यांनी आतापासूनच नियोजन करणे अनिवार्य आहे, असेही गगराणी यांनी सांगितले.

सिमेंट काँक्रिट रस्ते बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी, तर उपयोगिता वाहिन्यांच्या कामांचा कालावधी पाहता ७५ दिवसांचा कालावधी लागतो. दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रिटीकरण कामांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. अपूर्ण अवस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम हाती घ्यावे. कंत्राटदारांनी एका वेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती वेगाने पूर्णत्वास न्यावीत. काँक्रिटीकरण कामांमध्ये महानगरपालिकेचे ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरण आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.