Big Fight In Worli : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला रंगणार आहे. यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात जसा बारामती हा हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरला आहे अगदी तसाच मुंबईतला वरळी मतदारसंघही ठरला आहे यात काहीच शंका नाही. मुंबईतल्या वरळीत आदित्य ठाकरे शिवसेना (उद्धव ठाकरे), मिलिंद देवरा शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि संदीप देशपांडे (मनसे) अशी लढत असणार आहे. त्यामुळे आता वरळीची लढाई आदित्य ठाकरेंसाठी सोपी नसणार. २०१९ ला आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांचे काका आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीत उमेदवार दिला नव्हता. यावेळी मात्र ही स्थिती नाही.

वरळी विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत चित्र काय होतं?

शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना वरळीत ८९ हजार २४८ मतं मिळाली होती आणि आदित्य ठाकरे जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला होता. सुरेश माने यांना २१ हजार ८२१ मतं मिळाली होती. तर २०१४ ला या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. मागच्या १० वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आता आव्हान आहे ते आदित्य ठाकरेंपुढे. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरळी मतदारसंघाची लढाई त्यांच्यासाठी सोपी नसणार. कारण शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे) अशी लढत तर आहेच शिवाय संदीप देशपांडे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात काय होणार? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे पण वाचा- वंचितची आठवी यादी जाहीर; आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंविरोधात उमेदवार रिंगणात!

२०१९ च्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन वरळीचे संभाव्य उमेदवार सचिन अहिर यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने वरळीच्या जागेवर आदित्य ठाकरे यांची बिनविरोध निवड व्हावी, असे प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी मनसेला देखील विनंती करण्यात आली होती. तरीही विरोधकांनी उमेदवार दिले. पण शिवसेना, भाजपकडून या मतदारसंघात जास्त ताकद आणि फिल्डिंग लावण्यात आल्याने आदित्य ठाकरे या मतदारसंघात सहज जिंकून आले होते. मागच्या वेळी शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली होती. त्याचा फायदा आदित्य ठाकरेंना झाला होता. आता यावेळी चित्र पूर्ण बदलेलं आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.