महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांसाठी पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. “लसीकरणाबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करावं, लोकांच्या जिवाशी खेळू नये”, असं फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यानंतर राज्यातल्या लसीकरण कार्यक्रमाचं काय होणार? यावर चर्चा सुरू झाली होती. लसींचा पुरवठा कमी पडल्यास राज्यातील लसीकरणामध्ये खंड पडेल की काय? अशी देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उलट राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा