भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाची कोअर कमिटीची बैठकीहोत आहे. या बैठकीरच्या अगोदर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, माध्यमांना बैठकीबाबत माहिती देखील दिली. पत्रकार परिषदेस भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील प्रमुख मुद्य्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
आशिष शेलार म्हणाले, “ भाजपाची ठरवलेली आणि अपेक्षित नेत्यांची कोअर कमिटीची बैठक आज सुरू होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व कोअर कमिटीचे सदस्य, आज राज्यातील अतिशय महत्वाच्या विषयांवर व संघटनेच्या अति महत्वाच्या बाबींवर आज जवळपास पूर्ण दिवस बैठक करून चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, सामान्य जनता करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा, त्यांचं सुरळीत आयुष्य सुरू करावं या चिंतेपोटी स्वत: कामाला लागतेय आणि त्यावेळेला राज्य सरकारच्या विविध यंत्रणा यांनी आमचा शेतकरी, कारखानदार,व्यावसायिक, युवक, महिला, बाराबलुतेदार या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभं रहावं ही प्राथमिकता असताना, सरकारमध्ये राज्यात बसलेली लोक यांची प्राथमिकता राज्याच्या प्रश्नांना नाही.”
तसेच, “शेतकऱ्यास कशी मदत करता येईल. आदिवासी आश्रमशाळांना कशी मदत करता येईल, शहरांचा विकास कसा करता येईल. १२ बलुतेदारांना रोजगार कसा देता येईल. करोनामध्ये दुर्दैवाने जे मृत्युमूखी पडले त्यांच्या परिवारांना मदत कशी मिळेल. या सगळ्या प्रश्नांकडे कानाडोळा किंवा डोळे बंद करून हे सरकार बसलेलं आहे. केवळ एकाच गोष्टीवर हे महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे. ते म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद याच्या समर्थनार्थ पूर्ण वेळ सरकार काम करत आहे. म्हणून या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरुपाचं करावं लागेल, इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची आहे.” असंही शेलार यांनी बोलून दाखवलं.