महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. “शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार आहेत, तरी ते बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर बोलतात. मग इतके वर्षे काय केलं?” असा सवाल निलेश राणे यांनी केला. त्यांनी ट्वीट करत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष, तरी शरद पवार बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं.”
“मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत”
“मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही. म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीनमध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे,” असं म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारलाही टोला लगावला.
“हे बघून हसावं की रडावं कळत नाही…”
दरम्यान, निलेश राणे सातत्याने महाविकासआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवतात. तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली होती. मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला होता. २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय होता. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो होता.
हेही वाचा : “आजीच्या घरी अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्यांना दिसला नाही”; निलेश राणेंची टीका
“काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं होतं.