शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर १०० हून अधिक दिवसांनी जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आले. यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत व्यक्त न होता संयमी पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या कटुता संपवावी या भूमिकेचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी फडणवीसांचं तोंडभरून कौतुकही केलं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी फडणवीस कटुता संपवावी असं का म्हणाले याचं कारण सांगितलं आहे. ते गुरुवारी (१० नोव्हेंबर) एपीबी माझाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कटुता संपवावी ही भूमिका फडणवीसांनी घेतली, कारण…”

अतुल भातखळकर म्हणाले, “कटुता संपवावी ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. कारण आमची ती कायमची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी कायम म्हणत आलेत आणि आम्हीही म्हणत आलो की, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, तर विरोधक असतो. हल्ले करायचे, घाणेरड्या भाषेत बोलायचं असं सुरू आहे.”

“…तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता संपण्याची शक्यता”

“संजय राऊतांनी काय भाषा वापरली हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी जी भाषा वापरली ती ना माध्यमं दाखवू शकले, ना मी आत्ता ते बोलू शकतो. ही पश्चात बुद्धी आहे, मात्र तरीही त्याचं स्वागत आहे. त्यांना कटुता संपवण्याच्या दिशेने पावलं टाकायची असतील तर आजपासून त्यांच्या व्यवहारात त्याचं दर्शन घडावं. तसं झालं तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता संपण्याची शक्यता आहे,” असं मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं.

“खोके, गद्दार, खंजीर हेही थांबवावं”

अतुल भातखळकरांनी राऊतांच्या जुन्या विधानांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. संजय राऊत कटुता संपवण्याची भूमिका मांडणार असतील, तर चांगली गोष्ट आहे. फक्त त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून,स्वतःच्या पक्षापासून करायला हवी. खोके, गद्दार, खंजीर, लोकांना घरात जाऊन मारहाण केल्यानंतर शिवसैनिकांचं समर्थन करणं, माजी नौदल अधिकाऱ्यांना केलेली मारहाण हेही थांबवावं.”

हेही वाचा : संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”

“कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”

“मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कटुता वाढली. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड अशी मंडळी आहे,” असा आरोप भातखळकरांनी केला.