पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर होत असलेला अपव्यय टाळण्यासाठी पालिका आता ‘ग्रे वॉटर’ प्रकल्प हाती घेणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत स्वयंपाक घरातील, तसेच स्नानगृहातील वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणण्यात येणार आहे. त्यामुळे १० टक्के शुद्ध पाण्याची बचत होईल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे.
सध्या मुंबईत पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी मोठय़ा प्रमाणावर होतो. या पाश्र्वभूमीवर प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत ‘ग्रे वॉटर’ प्रकल्प राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी सोसायटीला २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे १० टक्के शुद्ध पाण्याची बचत होऊ शकेल. या प्रकल्पाची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असून त्यानंतर जनतेकडून त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती पालिका उपायुक्त (अभियांत्रिकी) प्रकाश कदम यांनी दिली.
‘ग्रे वॉटर’ प्रकल्पात कार्बन फिल्टरच्या मदतीने स्वयंपाकघर आणि स्नानगृहातील वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येईल. हे केलेले पाणी शौचालये, गाडय़ा धुणे, बगीचा आदींसाठी वापरता येईल. त्यामुळे प्रतिदिनी साडेतीनशे दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊ शकते.  २००० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या आणि ६० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सर्व सोसायटय़ांना, तसेच नव्या इमारतींना हा प्रकल्प सक्तीचा करण्यात करण्यात येणार आहे. महापालिका प्रतिदिनी ३४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना केला जातो. यापैकी केवळ १७०० दशलक्ष लिटर पाणी पिण्यासाठी वापरले जाते आणि उर्वरित पाणी इतर कामांसाठी वापरले जाते.