मुंबई : श्वानाच्या चाव्यामुळे नागरिकांना होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘रेबीजमुक्त मुंबई’संकल्प सोडला असून येत्या २८ सप्टेंबरपासून मुंबईमध्ये व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच रेबीजबाबत मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०३० पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्याअंतर्गत मुंबई महानगरपालिकेने २०२२ मध्ये ‘मुंबई रेबीज निर्मूलन’ प्रकल्प हाती घेतला. याच पार्श्वभूमीवर आता ‘वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस – मिशन रेबीज’सोबत मुंबई महानगरपालिकेने २८ सप्टेंबरपासून भटक्या श्वानांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा…  मुंबई :आयआयटी मुंबईमध्ये ७५ टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या

जनजागृतीवर भर

सहकारी गृहनिर्माण संस्था, शाळा, बांधकाम स्थळे, सार्वजनिक संस्था इत्यादींपर्यंत पोहोचून प्राणीविषयक कल्याणकारी कायदे आणि नियमांसंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ६५ शाळांमधील सुमारे १३ हजार ३३२ विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये २७१ शिक्षक आणि ७९३ नागरिकही सहभागी झाले होते.

हे ही वाचा…Lalbaug accident : लालबाग अपघात आणि नुपूर मणियारच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदे अटकेत

तक्रारी व विनंतीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

भटक्या किंवा पाळीव श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण करणे, तसेच यासंदर्भात तक्रारी किंवा विनंती नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘मायबीएमसी’ मोबाइल ॲपवर किंवा https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवरून नागरिक विनंती किंवा तक्रार नोंदवू शकतात. भटक्या श्वानांची नसबंदी करण्याच्या उपक्रमाला गती देण्यासाठी आणखी काही प्राणी कल्याण संस्था नियुक्त करण्यात येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.