मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मंगळवार रात्रीपासून कारवाई सुरू करण्यात आली असून गुरुवारी दिवसभरात ३९२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईतून स्वयंपाकाचे १२९ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर १०८ चारचाकी हातगाड्या जप्त करण्यात आल्या. वांद्रे पूर्व भागात सर्वाधक कारवाई करण्यात आली.
रस्त्यावर, उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून ते विकणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्याकरीता प्रत्येक परिमंडळासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. एका परिमंडळातील पथक दुसऱ्या परिमंडळात जाऊन कारवाई करीत आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्यामुळे विषबाधा झाल्याच्या घटना गेल्या महिन्यात दोन ठिकाणी घडल्या होत्या. गोरेगावमध्ये २६ एप्रिल रोजी शोर्मा खाल्यामुळे १० जणांना विषबाधा झाली होती. तर मानखुर्द परिसरात ७ मे रोजी पिझ्झा, बर्गर खाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पालिकेने मानखुर्द परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने खाद्यपदार्थ विक्रेत्या फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. मंगळवारपासून ही कारवाई सुरू झाली असून पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेचे उपायुक्त (विशेष) यांनी याबाबतचे निर्देश संबंधित पालिका यंत्रणेला दिले आहे.
हेही वाचा…मुंबईतील ११६ शिव योगा केंद्रातून ३१ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतले प्रशिक्षण
याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईसाठी परिमंडळ निहाय सात पथके तयार करण्यात आली आहेत. या कारवाईत खाद्यपदार्थांच्या गाड्या, सामान, गॅस सिलिंडर असे सामान जप्त करण्यात येणार आहे. यामध्ये १०८ चारचाकी गाड्या, स्वयंपाकाचे १२९ गॅस सिलिंडर आणि अन्य सामान जप्त करण्यात आले. हे सामान ग्रॅन्ट रोड, वांद्रे पूर्व आणि कुर्ला येथील गोदामात जमा करण्यात आले आहे.