Bombay HC : आईची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचं विकृत कृत्य करणाऱ्या मुलाची फाशी मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) कायम ठेवली आहे. कोल्हापूर येथील हे प्रकरण आहे. मुलाने आईची हत्या करुन तिच्या मृतदेहाच्या अवयवयांचे काही भाग शिजवून खाल्ले होते. मुलाने केलेलं हे कृत्य अमानावी आणि विकृत आहे असं निरीक्षणही न्यायालयाने ( Bombay HC ) नोंदवलं आहे आणि त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर येथे राहणारा आरोपी सुनील कोंचीकोरवी याने त्याच्या आईची हत्या दारुच्या पैशांसाठी केली होती. त्यानंतर त्याने आईच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाल्ले होते. कोल्हापूर येथील माकडवाला परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला ही भयंकर घटना घडली होती. या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने ८ जुलै २०२१ ला या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने हीच शिक्षा कायम ठेवली आहे. ही घटना दुर्मिळातली दुर्मिळ आहे तसंच आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे आणि आरोपी सुधारण्याची काहीही शक्यता नाही. असंही मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) म्हटलं आहे आणि त्याची शिक्षा कायम ठेवली आहे.

हे पण वाचा- दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला

मुंबई उच्च न्यायायलाने काय म्हटलंय?

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी आरोपी सुनील हा पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता. सदर प्रकरण हे नरभक्षणाचं प्रकरण आहे. आरोपीने आईची हत्या केल्यानंतर तिचा मेंदू, यकृत आणि इतर अवय शिजवून खाल्ले होते. अत्यंत दुर्मिळातलं दुर्मिळ असं हे प्रकरण आहे. आरोपी सुधारण्याची काही शक्यता नाही त्यामुळे त्याची फाशी कायम ठेवत आहोत असं मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) म्हटलं आहे.

हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं होतं?

आरोपी सुनील कोंचीकोरवी याची आई फुगे आणि कंगवे विकून उदरनिर्वाह करत होती. तिला राजू आणि सुनील अशी दोन मुलं होती. सुनील हा लहान मुलगा आहे. सुनीलला दारुचं व्यसन लागलं. हत्येची घटना घडली तेव्हा तो रात्री १० वाजता घरी आला होता. त्याने आईकडे पैशांची मागणी केली. आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. ज्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी सुनीलने त्याच्या आईवर चाकू हल्ला केला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाच लचके तोडले आणि काही अवयव शिजवून खाल्ले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.