लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे येत्या ३० मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीला राहुल गांधींना हजर रहावे लागण्याची शक्यता आहे. भिवंडीतील या प्रचारसभेदरम्यान, राहुल यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. संघाकडून सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या तपासणीनंतर भिवंडी न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना याप्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता राहुल गांधी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार का, भिवंडीतील सुनावणीला हजर राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.