मुंबई : सरकारविरोधात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या-खोटय़ा ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान नियमांतील दुरुस्तीची ५ जुलैपर्यंत अंमलबजावणी केली जाणार नाही, अशी हमी केंद्र सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर दुरुस्तीला अंतरिम स्थगिती देण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कायद्यातील सुधारणांना विरोध करत हास्यकलाकार कुणाल कामरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीवेळी कायद्यातील दुरुस्तीतून सरकारविरोधातील उपहासपूर्ण लेखन, चित्रण किंवा विडंबनाला वगळल्याचे सकृद्दर्शनी दिसत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. यावेळी याचिका दखल घेण्यायोग्य नसल्याचा केंद्राचा युक्तिवादही न्यायालयाने अमान्य केला होता. गुरूवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्यावेळी कायदा दुरूस्तीची अंमलबजावणी ५ जुलैपर्यंत केली जाणार नसल्याची हमी केंद्राच्या वतीने अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी दिली. याचिकेवर जूनमध्ये अंतिम सुनावणीसाठी ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली. परंतु, मधल्या काळात तथ्य तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याबाबत अधिसूचना काढली जाईल आणि ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केली जाईल, अशी भीती कामरा यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी व्यक्त केली आणि सुनावणी जूनमध्ये ठेवण्यास विरोध केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा