मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून मोसमी पावसाने मंगळवारी पूर्णपणे माघार घेतली. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.

राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईसह इतर भागात शनिवार, रविवार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात जरी घट झाली असली तरी दिवसा उन्हाचा चटका आणि सांयकाळी काहीसा गारवा असे वातावरण सध्या मुंबईत आहे. ढगाळ वातावरणामुळे पुढील दोन दिवस कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा सहन करावा लागेल. तसेच सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता असून त्यावेळी वातावरणात काहीसा काळ गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक, गोळीबार करणाऱ्यांना पिस्तुल पुरवल्याचा आरोप

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून यावेळी ३०-४० ताशी वेगाने वारे वाहतील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३.३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहर आणि उपनगरांतील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्यांनतर गडगडाटासह हलक्या सरी कोसळत होत्या.

हेही वाचा – जे.जे. रुग्णालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग

सर्वसाधारणपणे मुंबईतील मोसमी पाऊस ३० सप्टेंबरपर्यंत असतो. या वर्षी काही दिवस वगळता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांना पावसाने झोडपले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन – तीन दिवस किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.