मुंबई : मुंबई आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. ही प्रणाली वायव्येकडे जाताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी ३०-४० किमी वेगाने वारे वाहणार आहेत.

हेही वाचा – धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे! शासनाकडून धोरण जाहीर

मुंबईत मागील सलग दोन दिवस पाऊस कोसळत आहे. यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. तसेच कमाल तापमानात देखील घट झाली आहे. मागील काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत होती. मात्र, पावसामुळे दोन तीन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण सध्या मुंबईत दिसत आहे. दरम्यान, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता मंगळवारी देखील कायम आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, “आज सकाळी…”

दरम्यान, शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या पावसामुळे हवेचा दर्जाही सुधारला आहे. काही भागात सातत्याने हवेचा दर्जा वाईट असल्याची नोंद झाली होती. मात्र सोमवारी हवेचा दर्जा समाधानकारक होता. मुंबई आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झाली आहे. हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक पातळीवर नोंदवला गेला. त्याचबरोबर सोमवारीही गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक होता.