आठवडय़ाभरात दोन बोअरवेलची तरतूद
देवनार कचराभूमीत लागलेली आग विझविण्यासाठी पिण्याचे पाणी न वापरता चेंबूर परिसरातील तलावातील पाणी वापरण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता चेंबूरमधील आशीष तलावातील पाणी देवनार कचराभूमीतील आग विझविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या आठवडय़ात कचराभूमीत दोन बोअरवेल खोदण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
देवनार कचराभूमीत गेल्या शनिवारी दुपारी लागलेली आग विझविण्यासाठी मंगळवापर्यंत तब्बल १० लाख ७८ हजार लिटर पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात आला. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी देवनार कचराभूमीबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी पालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. कचराभूमीतील आग विझविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे आदेश अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले. चेंबूर परिसरात आशीष तलाव असून त्यात मुबलक पाणी आहे. या तलावातील पाणी पिण्याव्यक्तीरिक्त अन्य कामांसाठी वापरले जाते. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या तलावातील पाणी कचराभूमीतील आग विझविण्यासाठी करावा, असे आदेश मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले. आशीष तलावातील पाणी आग विझविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. आग विझविण्यासाठी कचराभूमीत बोअरवेल खोदण्याचे आदेशही देण्यात आले. येत्या सोमवारी बोअरवेल खोदण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा