राज्यातील सत्तासंघर्षामध्ये अखेर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांनाही केवळ ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हाचा वापर तात्पुरत्या स्वरुपात करता येणार असं केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलं आहे. त्यानंतर सोमवारी या दोन्ही गटांना वेगळी नावं निवडणूक आयोगाने मंजूर केली आहेत. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे पर्यायी नाव देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आलंं आहे. याच निर्णयासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेनेचे माजी नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत ते असते तर काय झालं असतं याबद्दल भाष्य केलं आहे.
नक्की वाचा >> ‘शिवसेना’ नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे रडल्याच्या दाव्यावरुन मनसेचा टोला; म्हणाले, “आम्ही २००९ ला जिंकलो, २०१४ ला पराभूत…”
मशाल या चिन्हावर १९८५ साली पहिल्यांदा निवडणूक लढवून जिंकून आलेले शिवसेनेचे एकमेव आमदार अशी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी ३६ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. १९८५ मध्ये मुंबईतील माझगाव विधानसभा मतदरासंघातून ‘मशाल’ या चिन्हावर भुजबळ निवडून आले होते. त्यावेळी निवडणूक कशापद्धतीने लढले आणि जिंकून आले यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर सोशल मीडियावर सध्या १९८५ मध्ये छापण्यात आलेली प्रचाराची जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला होता.
नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी बदलला WhatsApp DP; सूचक इशारा करणारा DP चर्चेत
यावेळी भुजबळ यांनी शिवसेनेचं नाव जाणं हे क्लेशदायक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दोन्ही गटांच्या नावांमध्ये शिवसेना नावाचा उल्लेख आहे ही एकमेव समाधानाची बाब असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. “बाळासाहेबांची शिवसेना काय किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय त्यामध्ये शिवसेना नाव आहे एवढाच आनंद आहे. पण ज्या गोष्टी होत आहेत त्या मनाला क्लेश देणाऱ्या आहेत,” अशी मनातील खदखद भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच, “सर्वसामान्य शिवसैनिकांनाही यामधून दु:ख होत आहे,” असंही भुजबळ म्हणाले.
नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत
यानंतर पत्रकारांनी भुजबळ यांना बाळासाहेब असते तर अशा अर्थाने प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ यांनी, “आता ‘जर-तर’ला काय उत्तर देणार? ‘जर असते तर काय?’ ला उत्तर देता येणार नाही,” असं म्हटलं. मात्र पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या भुजबळ यांनी, “बाळासाहेब असते तर कदाचित हे काही घडलं नसतं शिवसेना आणखीन पुढे गेली असती,” असं भावनिक विधान केलं.