मुंबई : यंदा आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पहिल्यांदाच भारतात आलेल्या चीनमधील ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या रोबोटसंदर्भात भारतातील बिद्युत इनोव्हेशन कंपनीचे संस्थापक राहुल शाह यांनी अधिक माहिती देत बुधवार, १८ डिसेंबर रोजी प्रात्यक्षिक दिले. तसेच हा रोबोट मानवाच्या रोजगाराच्या संधी धोक्यात आणणार नाही. तर रोजगारांची दिशा बदलेल आणि धोकादायक ठिकाणी मानवी हस्तक्षेप कमी करण्यास उपयुक्त ठरेल. असे त्यांनी अधोरेखित केले.

जगभरातील विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व सध्या पवई संकुलात सुरू आहे. या महोत्सवात ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’च्या विविध हालचाली व क्रियांनी सर्वांना थक्क केले. तसेच आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात माणसांप्रमाणे चालणारा व हात उंचावणारा, हस्तांदोलन करणारा आणि विविध क्रिया सहजतेने करणारा ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ पाहून उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींमध्ये उत्साह संचारला. तसेच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत आयआयटी मुंबईचे दीक्षांत सभागृह दणाणून सोडले होते.

हेही वाचा…मुंबई व औरंगाबादमधील ९ ठिकाणी ईडीचे छापे

’रोबोट्सची रचना ही मानवाचा रोजगार धोक्यात आणण्यासाठी केलेली नाही. तर धोकादायक परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि काम सहजतेने होण्यासाठी केलेली आहे. युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट हा मानवी आयुष्यात येणारे धोके टाळण्यासाठी आणि संकटांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच लष्करी कारवाईदरम्यान रेकी करण्यासाठी, विविध कारखान्यांमधील तापमानाची तपासणी, वर्दळीच्या ठिकाणी असणारी स्फोटके आदी संशयास्पद वस्तू शोधून काढण्यासाठी या रोबोटचा वापर होईल, असा विश्वास राहुल शाह यांनी व्यक्त केला. तसेच नोकरी गमावण्याच्या भीतीपेक्षा परिस्थितीशी जुळवून घेणे, कौशल्ये सुधारणे आणि नवनवीन शोध घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader